रेल्वेत प्रत्येक कामाचे कंत्राट देण्याचा सपाटा लावला आहे. मात्र, कंत्राटदार आणि रेल्वेच्या ढिसाळ कारभारामुळे गोरगरीब कामगारांना चटके बसत आहेत. गुरुवारी दादर रेल्वे स्थानकात नवीन कंत्राटदार येताच काही कारण न देताच चार कर्मचार्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले. त्यामुळे सफाई कर्मचार्यांनी गुरुवारपासून काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. त्यामुळे याचा फटका दादर रेल्वे स्थानकातील साफसफाईला बसत आहे.
दादर रेल्वे स्थानकात १३० कंत्राटी सफाई कामगार कार्यरत आहेत. यातील काही कर्मचारी गेल्या १८ वर्षांपासून रेल्वे परिसरात सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. मात्र नवीन वर्षांत दादर रेल्वे स्थानकाचे सफाई कंत्रांट संपल्याने २ जानेवारी २०२० पासून नवीन कंत्राटदाराची नेमणूक झाली. या नवीन कंत्राटदाराने पहिल्याच दिवसात काहीही कारण न सांगता चार कामगारांना चक्क कामावरून काढून टाकले. इतर कामगारांना कारण विचारल्यास काढून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे. याची तक्रार रेल्वे अधिकार्यांकडे केली असता, यावर अधिकार्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कंत्राटी सफाई कामगारांनी गुरुवारपासून रेल्वे आणि कंत्राटदाराविरोधात काम बंद आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत कामावरून काढून टाकणार्या कर्मचार्यांना कामावर घेत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन असे सुरुच राहिल, अशी प्रतिक्रिया सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे उपाध्यक्ष अमित भटनागर यांनी दैनिक ‘आपलं महानगर’ला दिली आहे.
हुकूमशाही खपवून घेणार नाही
रेल्वेमध्ये कंत्राटी सफाई कामगार काम करत आहे. मात्र कंत्राटदारांकडून त्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. तसेच गोरगरीब मजुरांना अतिरिक्त काम दिले जात आहे.कित्येक कामगारांना 2 महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. सोबतच गाडी सफाई आणि धुण्यासाठी पर्याप्त साहित्य नसल्यामुळे सफाई कर्मचार्यांमध्ये रेल्वे प्रशासनाविरोधात आक्रोश केल्यास कामावरून काढण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे या कंत्राटदाराची आम्ही हूकूमशी खपवून घेणार नाही,अशी प्रतिक्रिया सेंट्रल रेल्वे मजदूर संघाकडून देण्यात आली.