ओमिक्रोनचा वाढत धोका लक्षात घेऊन मुबंईतील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग सुरू करून सर्वांना वर्क फ्रॉम होमची परवानगी द्या अशी मागणी शिक्षक भारतीने आज शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना पत्र लिहून केली आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी सांगितलं आहे. मुंबईत ओमिक्रोनची सुनामी आलेली आहे. दर दिवशी पंधरा हजारापेक्षा जास्त रुग्ण संख्या नोंदवली जात आहे. अशा परिस्थितीत मुंबईत दहावी-बारावीचे वर्ग ऑफलाइन पद्धतीने सुरू ठेवणे धोकादायक ठरत आहे. शेकडो मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी नव्या व्हेरीअंटमुळे आजारी पडलेले आहेत. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष शाळेत येऊन अध्यापन करणे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्यासारखे आहे, असं शिक्षक भारतीने शिक्षणमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू झाले आहे परंतु पूर्ण झालेले नाही. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण होईपर्यंत ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवण्यास मंजुरी द्यावी तसेच सर्व मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची परवानगी देणे आवश्यक आहे, असं मोरे यांनी सांगितलं.
हेही वाचा – Mumbai Corona Update: मुंबईत लॉकडाऊन अटळ; दैनंदिन रुग्णसंख्या २० हजार पार