मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्य सरकारने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी १४ एप्रिलपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे देहविक्रय करणा-या महिलांची आणि तृतीय पंथी यांची परवड होऊ नये यासाठी पालिकेच्या मार्गदर्शनाखाली काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. याप्रसंगी, पालिका अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल, अश्विनी भिडे, स्थानिक नगरसेवक श्री. जावेद जुनेजा, सहाय्यक आयुक्त डॉ.संगीता हसनाळे आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाची सुरुवात अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, स्थानिक नगरसेवक जावेद जुनेजा यांच्या विशेष उपस्थितीत ना. म. जोशी मार्गावरील सावित्रीबाई फुले महापालिका शाळेत नुकतीच करण्यात आली. या उपक्रमातंर्गत विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने व महापालिकेच्या पुढाकाराने ४ हजार ५०० देहविक्रय करणा-या महिला व तृतीय पंथीयांना विविध दैनंदिन गरजानुरुप अन्नधान्याचा समावेश असलेले किटचा पुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती नियोजन विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ.संगीता हसनाळे यांनी या निमित्ताने दिली आहे.
मुंबई महापालिका परिसरातील ४ हजार ५०० देहविक्रय करणा-या महिला व तृतीय पंथीयांचे वास्तव्य आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात या महिला व तृतीय पंथीयांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने महापालिकेच्या नियोजन विभागाने पुढाकार घेऊन विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने अन्नधान्य किट वितरणाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या किटमध्ये तांदूळ, कणिक, साखर, चहा, मीठ, तिखट, हळद, गरम मसाला, मसुरीची डाळ, चणे, कांदे, बटाटे, खाद्यतेल, अंगाचा साबण व कपडे धुण्याचा साबण इत्यादी बाबींचा समावेश आहे.