दिवाळी सणानिमित्त मुंबई पोलिसांकडून शहरात 30 ऑक्टोबरपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे या काळात मुंबईत पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र जमता येणार नाही. याशिवाय मोर्चा, मिरवणूक, वरात आणि सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावरही मुंबई पोलिसांकडून बंदी घातली आहे. 16 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 30 ऑक्टोबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत हा आदेश लागू असेल. यामुळे दिवाळीच्या 15 दिवस महापालिका क्षेत्रात हा आदेश लागू असेल. मुंबई पोलिसांनी याबाबत एक परिपत्रक जारी केले आहे. ज्यानुसार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कलम 144 नुसार कठोर कारवाई करण्यात येईल.
मुंबई पोलिसांचा नेमका आदेश काय?
1951 मधील अधिकारानुसार, संजय लाटकर, पोलीस उपायुक्त( कायदा व सुव्यवस्था) यांनी मुंबई हद्दीत 30 ऑक्टोबर 2022 पर्यंत जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. शहरातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 11 ऑक्टोबरला या संदर्भात आदेश काढण्यात आला आहे. या आदेशानुसार 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही संमेलनास प्रतिबंध आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीला मिरवणूक काढणे, लाऊडस्पीकर, वाद्ये, वाद्य बँड, फटाके फोडण्यास प्रतिबंध केल्याचे पोलीस उपायुक्तांनी सांगितले आहे.
जमावबंदीचा नियम ‘या’ गोष्टींना लागू होणार नाही
मुंबईत 30 ऑक्टोबरपर्यंत लागू करण्यात आलेल्या जमावबंदीच्या आदेशात काही गोष्टी वगळण्यात आल्या आहेत. यामध्ये विवाह समारंभ, अंत्यविधी कार्यक्रम, सहकारी संस्था आणि अन्य संस्थांच्या बैठका, क्लबमध्ये होणाऱ्या बैठकांना वगळण्यात आले आहे. यासह चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणे, यासोबत चित्रपट, नाटक किंवा कार्यक्रम पाहण्याच्या उद्देशाने संमेलन, न्यायालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार, व्यवसाय या कारणांनी होणाऱ्या गर्दीवरही कोणतेही निर्बंध नसतील.