मनसेचे नेता आणि गोविंदा मंडळाचे सदस्य असलेले बाळा नांदगावकार यांनी यंदा दहीहंडी उत्सव साजरा करू नका, असे आवाहन गोविंदा पथकांना केले आहे. त्यांनी प्रसिद्धी पत्रकार जारी करून आपली भूमिका मांडली आहे. दहीहंडी उत्सव साजरा न करण्याची संयमी भूमिका घेऊन करोनाला आळा घालूया, असे आवाहन मनसेनेच्या वतीने केले आहे. यंदा हिरमोड झाला तरी पुढच्यावर्षी दणक्यात दहीहंडी उत्सव साजरा करू, असेही त्यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले बाळा नांदगावकार
मी स्वत: गोविंदा आहे. त्यामुळे या सणाचे महत्त्व आणि उत्सुकता जाणून आहे. आमचा पक्ष हा कायमच आपले सर्व हिंदू सण थाटात, उत्साहात साजरे करावे हीच भूमिका वर्षानुवर्षे मांडत आला आहे. गोविंदाच्या थरांपासून ते अनेक विषयाबाबत आमचा पक्ष प्रत्येक वेळी गोविदांच्या बाजून उभा राहिला आहे. मात्र, यावेळी परिस्थिती ही अतिशय वेगळी आहे, या करोना महामारीमुळे यावर्षी आपण सर्वांनी जाहीर दहीहंडीचा उत्सव साजरा करू नये. यावर्षी जरी आपला हिरमोड होणार असला तरी पुढील वर्षी हा उत्सव आपण एकदम जल्लोषात व उत्साहात साजरा करून ती कसर भरून काढू, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.
यंदा राज्यावर कोरोनाचं संकट असल्याने सर्वधर्मीयांनी सण-उत्सवाला उत्सवी रुप देणे टाळले आहे. अनेकांनी घरातच सण साजरे करून राज्यशासनालाही करोना रोखण्यासाठी सहकार्य केले आहे. या आधी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि भाजपचे आमदार राम कदम यांनी दहीहंडी उत्सव रद्द करण्याची घोषणा केली आहे.
हेही वाचा –
…अन्यथा ९ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करू; मराठा क्रांतीचा इशारा