पहाटे गारवा, दुपारी कडाक्याचं ऊन आणि पुन्हा रात्री गार या वातावरणाचा अनुभव सध्या मुंबईकर घेत आहेत. वातावरणात दुहेरी बदल जाणवू लागल्याने मुंबईकर हैराण झाले आहे. दरम्यान, मुंबईत सोमवारी गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत कमी तापमानाची नोंद करण्यात आली. मुंबई हवामान खात्याच्या माहितीनुसार, ३३ अंशांनी खाली घसरलं होतं. त्यामुळे, किमान सोमवारी आणि त्या आधी दोन दिवस मुंबईकरांना उष्णतेपासून सुटका मिळाली.
तापमानासोबत वाढत्या आजारांची नोंद
भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) हवामान अंदाजात सांगितले की, सांताक्रूझ मधील कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस पर्यंत कमी होईल. तर, किमान तापमान १९ सेल्सिअसपर्यंत असेल. तसंच, कुलाब्यातील कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस आणि किमान १८ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार, सोमवारी तापमानाची नोंद करण्यात आली. पण, या वाढत्या तापमानासोबत वाढत्या आजारांची ही नोंद केली जात आहे.
तापाचं जास्त प्रमाण
पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये सर्दी, खोकला, गॅस्ट्रो, लेप्टो या आजारांनी त्रस्त असलेले रुग्ण दाखल होत आहेत. यात सर्वात जास्त प्रमाण हे तापाचं आहे. बदललेल्या वातावरणाचा त्रास मुंबईकरांना होत असून पालिकेच्या नायर हॉस्पिटलमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्वात जास्त तापाचे रुग्ण दाखल झाले होते. एकूण ५२ ताप, लेप्टो आणि डेंग्यूच्या रुग्णांची नोंद होऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करुन घेण्यात आलं होतं. तर, ओपीडीमध्ये २३ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी या काळात एकूण २०६ रुग्ण दाखल झाले होते. त्यात तापाचे सर्वात जास्त १२९ आणि ग्रॅस्टोचे ७७ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. वाढलेल्या रुग्णांची संख्या पाहता आजारांमध्ये तब्बल दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मुंबईकरांचा घामटा निघाला
मे महिन्यात जाणवणार ऊन मार्च महिन्यातच जाणवू लागल्याने मुंबईकरांचा घामटा निघाला आहे. अॅलर्जी झाल्यानंतर ज्याप्रकारे शिंका येतात, नाक गळते, सर्दी होते, असा त्रास रुग्णांना होत असल्याचं तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. विचित्र वातावरणामध्ये विषाणू संसर्गामुळे डोकेदुखी, सर्दी, घसादुखी याचा त्रास होत आहे. त्यामुळे, आपल्या खाण्या-पिण्यावरही नियंत्रण ठेवा असाही सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देतात.
हेही वाचा – होळीच्या तोंडावर भारतासाठी ‘व्हायरल’ करोनाचा एलर्ट