संपूर्ण विश्वात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूची दहशत मुंबईतही निर्माण झाली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन नयेत म्हणून २२ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. या लॉकडाऊन काळात हॉस्पिटल आणि नागरिकांच्या घरातील विद्युत पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा म्हणून बेस्टच्या विद्युत विभागातील कर्मचारी या संकटकाळात अहोरात्र जीवाची आणि कुटुंबाची पर्वा न करता आपली सेवा देत आहेत. बेस्ट प्रशासनाचा नजरेतून दुर्लक्षित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
वैश्विक महामारी म्हणून घोषित झालेल्या कोरोना विषाणूचा देशात वाढता संसर्ग पाहता या महामारीला नियंत्रित आणण्यासाठी देशात २१ दिवसाचा देशव्यापी लॉकडाऊन आहे. अशातच कोरोनाच्या लढ्यात पोलिस, डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार, सरकारी यंत्रणा देवदूत म्हणून काम करीत आहे. मात्र मुंबईकरांना अखंडित वीज पुरवठा सेवा देण्याचे काम बेस्ट उपक्रमातील विद्युत विभागाचे ५ हजार कर्मचारी देत आहे. त्यांना विसरू चालणार नाही. बेस्टचे अधिकारी आणि कर्मचारी मागील १८ दिवसापासून जीवाची पर्वा न करता अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी दररोज १६ तास काम करत आहेत. अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने ते त्यांचे कर्तव्य तर बजावतच आहेत. परंतु देशाच्या अशा आणीबाणी प्रसंगात नोकरीचे कर्तव्य बजावण्याच्या उद्देशापेक्षा जनसेवा करण्याचे भाग्य त्यांना मिळत आहे. ह्या उद्देशाने जनतेची सेवा करत आहेत. मात्र बेस्ट प्रशासने सुद्धा त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. बेस्टच्या विद्युत कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर आणि हँडग्लोज प्रशासनाकडून पुरविण्यात यावे असे आदेश दिले आहे. तरी सुद्धा या कर्मचाऱ्यांना मुबलक प्रमाणात या वस्तू उपलब्ध होत नसल्याची खंत बेस्टच्या विद्युत विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दैनिक आपलं महानगर जवळ व्यक्त केली आहे.
अखंडित वीज पुरवठा हेच आमचे ध्येय
नागरिकांच्या जीवनावश्यक गरजा अन्न, वस्त्र, निवारा सोबतच वीजही जीवनाश्यक गरज झाली आहे. त्यातही लॉकडाऊनमुळे नागरिक घरीच आहे. त्यात वेळ घालवण्याकरिता नागरिकांना करमणुक म्हणून टीव्हीच साधन असून टीव्हीवर कार्यक्रम पाहणार्यांची संख्या वाढली आहे. अशातच नागरिक आपल्या घरातच रहावे आणि त्यांना वीज सेवा अखंडीत मिळावी म्हणून बेस्टच्या विद्यूत विभागाचे अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस सतर्क आहे.
बेस्ट प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठोस उपाययोजना करणे
अखंडित वीज पुरवठा हेच आमचे ध्येय आहे. यापूर्वी आठ तासांची ड्युटी करायचो आता या आपत्कालीन परिस्थितीत डबल ड्युटी करण्यावी लागत आहेत. ते आम्ही आपले प्रामाणिक कर्तव्य बजावत आहे. मात्र बेस्ट प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहेत, अशी प्रतिक्रिया बेस्ट कामगार संघटनेचे सरचिटणीस जगनारायण कहार यांनी दिलेली आहे
थोड कौतुक बेस्टच्या विद्युत कर्मचाऱ्यांचे करा
या जागतिक संकटा समोर लढा देणाऱ्या डॉक्टर्स, पोलिस, नर्स, सफाई कामगार यांचे सर्व मंत्री, सेलिब्रेटीकडून कौतुक होत आहे. त्याच प्रमाणे आमचेही अत्यावश्यक सेवेमध्ये मोडणार्या बेस्टच्या विद्युत कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे जे मुंबईकरांच्या सेवेसाठी अहोरात्र काम करत आहे. त्यांचे कौतुक व्हावे हेच आम्हाला अपेक्षित आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कामाप्रती आणखी उत्साह निर्माण होईलही आमची अपेक्षा आहेत.
आशिया खंडातली सर्वात मोठी श्रीमंत असलेली महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिकाची ओळख आहे. ज्या प्रमाणे पुणे महानगरपालिकेने अत्यावश्यक सेवामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक कोटीचे कोरोना सुरक्षा कवच योजना आणली आहे. त्याच धर्तीवर मुंबईच्या बेस्ट आणि महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुद्धाही योजना द्यावीत. – जगनारायण कहार, सरचिटणीस बेस्ट कामगार संघटना