परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीने केलेली कारवाई ही सूडबुद्धीने केलेली कारवाई असून शिवसेना या कारवाईने दबून न जाता कायदेशीर उत्तर देईल असे मत राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून मंत्र्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र अशाप्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करणे सर्वस्वी चुकीचे असून ते करणे लोकशाहीला घातक आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारे कारवाई करून शिवसेनेला नामोहरम करण्याचा प्रयत्न करण्यात आला तरीही आशा दबावाला आम्ही बळी पडणार नाही. शिवसेना कधीही अशा दबावापुढे झुकली नाही आणि यापुढेही झुकणार नाही. या कारवाईला आम्ही नक्की कायदेशीर उत्तर देऊ असे मत श्री शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या दिवशीच ही कारवाई करण्यात आली असली तरीही राज्यसभेच्या निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यासाठी 31 मे ही तारीख अखेरची असून त्यानंतरच प्रत्यक्ष किती उमेदवार रिंगणात राहतात ते स्पष्ट होणार आहे. राज्यसभेच्या सहा जागासाठी शिवसेनेने आपल्या दोन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज आज दाखल केले असून त्यांना लागणारी मतं देखील आमच्याकडे आहेत त्यामुळे शिवसेनेचे दोन्ही उमेदवार नक्की निवडून येतील अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी बोलताना दिली.