वसई-विरार महापालिकेच्या मुख्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या सफाई कामगार, मजूर आणि शिपायांना आयुक्तांनी कामाला लावून बिनकामाचा पगार घेण्याची प्रथा मोडीत काढली आहे. त्याचबरोबर चतुर्थश्रेणी कर्मचार्यांना कामावर असताना गणवेश घालणे बंधनकारक करण्यात आले असून आदेश न जुमानणार्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.
महापालिका मुख्यालयात अनेक मजूर, सफाई कामगार, शिपाई काही अधिकारी आणि पदाधिकार्यांच्या दिमतीला असून कुठलेही काम न करता गेल्या अनेक वर्षांपासून पगार लाटत असल्याची बाब आयुक्त गंगाथरन डी. यांनी उजेडात आणली होती. त्यानंतर त्यांनी अशा बिनकाम्या चतुर्थ श्रेणी कामगारांवर कामाची जबाबदारी द्यायला सुरुवात केली आहे. पहिल्या लॉटमध्ये मुख्यालयातील 129 चतुर्थ कामगारांना काम दिले गेले आहे.
105 चतुर्थ श्रेणी कामगारांना अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, प्रभारी सहाय्यक आयुक्त आणि विभाग प्रमुखांकडे पाठवले आहे. त्या कामगारांना आता संबंधित विभागातून काम दिले जाणार आहे. वसईतील जी. जी. कॉलेज, नालासोपार्यातील रिद्धी हॉस्पिटल, वालीवमधील अग्रवाल हॉस्पिटल आणि वसईतील कौल सिटी याठिकाणच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये 19 मजुरांची रवानगी करण्यात आली आहे. याठिकाणी त्यांना क्वारंटाईन सेंटरमधील वैद्यकीय अधिकार्यांच्या आदेशानुसार दैनंदिन काम करावे लागणार आहे. तर पाच सफाई कामगारांची रवानगी तुळींज हॉस्पीटलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
कार्यालयात काम करणार्या मजूर, सफाई कर्मचारी आणि शिपायांना महापालिकेकडून दरवर्षी गणवेश दिले जातात. पण, हे कामगार गणवेश परिधान न करता साहेबाच्या रुबाबात वावरताना दिसत होते. त्यांच्यावरही आयुक्तांनी कडक निर्बंध लादले आहेत. गणवेश न घालता कार्यालयात वावरणे शिस्तीला धरून नसून अशा कर्मचार्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी अधिकारी आणि विभाग प्रमुखांना दिले आहेत.