कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरमधून मुंबईमध्ये मोठ्या संख्येने अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी लोकं येत होतं. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत सेवा देण्यासाठी येणाऱ्या लोकांमध्येच कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आल्यानंतर अखेर कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी आणि उल्हासनगरचे पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी मुंबईतून कल्याण-डोंबिवली-उल्हासनगरमध्ये प्रवास बंदी जाहीर केली होती. पण कर्मचारी वर्गाच्या विनंतीनंतर अखेर २४ तासांच्या आत या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने हा निर्णय तात्पुरता स्थगित केला असल्याचं जाहीर केलं आहे. या निर्णयामुळे शेकडो चाकरमान्यांचा जीव भांड्यात पडला आहे. एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले असताना कल्याण-डोंबिवलीत त्यांना प्रवेश बंद करण्यात आल्यामुळे सरकारी यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव ठळक झाला होता.
कल्याण-डोंबिवलीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. विशेष बाब म्हणजे यातले बहुतांश रुग्ण हे अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी मुंबईत जात असल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यामुळे मुंबईतूनच कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये देखील कोरोनाचा प्रसार होत असल्याच्या निष्कर्षावर येत या दोन्ही महानगर पालिकांनी ही बंदी घातली होती. तसेच, या कर्मचाऱ्यांची थेट मुंबईतच राहण्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती.
मात्र, या मुद्द्यावरून टीका होऊ लागल्यानंतर अखेर आपल्या भूमिकेपासून थोडी शिथिल भूमिका घेत कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेत प्रवेशबंदीचा निर्णय तात्पुरता स्थगित करण्यात आला.