गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादकांना याचा मोठा फटका बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याचे दर पडल्याने शेतकरी अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. या संतपते शेतकऱ्यांनी कांदा विकून आलेली तुटपुंजी रक्कम थेट पंतप्रधान मोदींना पाठवल्यानंतर आता राज्य सरकारला अखेर जाग आली आहे. कांद्याला प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.
किलोमागे १ ते २ रुपयांचा भाव
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गेले काही दिवसांपासून प्रतिकिलोमागे १ ते २ रुपयांचा भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. कांदा उत्पादकांचा वाढता रोष लक्षात घेता सरकारनं क्विंटल मागे २०० रुपयाचे अनुदान देण्याचा दिलासादायक निर्णय घेतला आहे. १५ डिसेंबर पर्यंत कांदा बाजारात आणणाऱ्या शेतकऱ्यांना ही अनुदानाची रक्कम मिळणार आहे. याशिवाय परराज्यातील कांद्यांच्या वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचाही सरकारचा विचार आहे.
यामुळे घेण्यात आला निर्णय
बऱ्याच दिवसांपासून कांदे उत्पादकांना किलोमागे फक्त १ ते २ रुपयांचा दर मिळत असल्यानं शेतकरी अक्षरश: रडकुंडीला आला होता. कांदा उत्पादकांना हवा तसा भाव मिळत नसल्याने नाशिकच्या निफाडमध्ये राहणाऱ्या संजय साठेंनी ७५० किलो कांदा विकला आणि त्यातून त्यांना मिळणारी रक्कम मोदी सरकार देण्यात आली आहे. साठेंनी ७५० किलो कांदा विकल्यानंतर फक्त १ हजार ६४ रुपये मिळाले होते. ही कमाई त्यांनी पंतप्रधान मोदींना मनीऑर्डरनं पाठवली होती. त्यानंतर पीएमओनं या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आणि हा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.
वाचा – केंद्राचे नाफेडला २५ हजार मेट्रिक टन कांदा साठवणुकीचे आदेश
वाचा – कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आक्रोश आंदोलन