मुंबईसह राज्यात सध्या दिवाळीसाठी मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. पण, सणादरम्यान सर्वात जास्त भेसळयुक्त पदार्थांची विक्री होते. याच पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन ही मुंबईत खाद्यपदार्थांची तपासणी करत आहे. शिवाय पदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास ग्राहकांनी तक्रार नोंदवावी असं ही आवाहन करण्यात आले आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या आरोग्यास हानी पोहोचू नये यासाठी एफडीएने आतापासूनच कंबर कसत वापरण्यात येणाऱ्या दूध, दूग्धजन्य पदार्थ, खवा, मावा , बाहेरून येणारी स्पेशल बर्फी, खाद्यतेल, फरसाण, शेव इत्यादी पदार्थांची तपासणी करत अन्न पदार्थांचे उत्पादक आणि घाऊक विक्रेते यांच्याविरोधात तीव्र मोहिम हाती घेतली आहे.
५ ठिकाणी एफडीएने टाकल्या धाडी
एफडीएने १९ आणि २० ऑक्टोबर या दोन दिवशी ५ ठिकाणी धाडी टाकल्या. धारावी, कुर्ला, शिवडी, बोरिवली परिसरातील उत्पादक आणि विक्रेत्यांवर या कारवाई दरम्यान धाड टाकली गेली. या कारवाईत दूध, दुग्धजन्य पदार्थ, खवा, मावा, परराज्यातून येणारी स्पेशल बर्फी, खाद्यतेल, फरसाण, शेव या पदार्थांची तपासणी करण्यात आली. तर, एकूण ३ लाखांचे खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले.
“या कारवाई एकूण ३ लाख रुपये किंमतीचे अन्नपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तसंच, एकूण १२ अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. तपासणी अहवाल आल्यानंतर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.” – शैलेश आढाव, सह आयुक्त एफडीए अन्न विभागाचे
या क्रमांकावर करा तक्रारी
तर, सणासुदीच्या दिवसात वाढत्या मागणीनुसार भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्व ग्राहकांनी परवानाधारक अथवा नोंदणीधारक विक्रेत्यांकडूनच अन्नपदार्थ खरेदी करावे. अन्न पदार्थांच्या भेसळीबाबत काही तक्रार असल्यास १८०० २२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करण्याचं आवाहन अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी केले आहे.