मुंबई – मुंबईत गेल्या अडीच वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या मात्र सध्या नियंत्रणात असलेल्या कोरोनाने अनेकांचे बळी घेतले. मात्र त्याच्या अनेक पटीने कोरोनाबाधितांनी या गंभीर आजारावर यशस्वीपणे मात केली. आता त्या कोरोनामुक्त झालेल्यांना क्षयरोगाची लागण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे शासन व महापालिकेसमोर मुंबईला २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त बनवायचे आव्हान उभे राहिले आहे. त्यासाठी मुंबईतील ५० लाख लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. एक लाखामागे साडेतीन हजार संशयितांचा शोध घेण्यात येणार आहे.
मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोना प्रादूर्भाव वाढायला लागला. त्यामुळे शासनाने मुंबईसह राज्यात टाळेबंदी जाहीर केली. अनेक कठोर बंधने घालण्यात आली. अखेर विविध उपाययोजना केल्यावर दोन वर्षांनी कोरोना नियंत्रणात आला. या कोरोनामुळे मुंबईत अनेकजण दगावले. मात्र पालिका आरोग्य यंत्रणेने हजारो लोकांचे प्राण यशस्वी उपचाराने वाचवले. मात्र आता या कोरोनामुक्त लोकांना क्षयरोगाची लागण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
अगोदरच मुंबईला क्षयरोगमुक्त करण्यासाठी पालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील असताना आता हे नवीन आव्हान पालिका आरोग्य यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे. त्यावर मात करण्यासाठी आणि मुंबईला २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दीष्ट गाठण्यासाठी आरोग्य यंत्रणेने क्षयरोग संशयितांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेतून ५० लाख लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. एक लाख लोकांमागे साडेतीन हजार संशयितांचा शोध घेण्यात येत आहे. या मोहिमेच्या दरम्यान ९ लाख ८६ हजार घरांमधील ४० लाख ३४ हजार ५१३ इतक्या लोकसंख्येची तपासणी ही सार्वजनिक आरोग्य खात्याच्या पथकाद्वारे केली जाणार आहे. यासाठी २ हजार ८२९ चमू कार्यरत असून या चमू सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत घरांना भेटी देणार आहेत. आरोग्य सेविका, आशा वर्कर्सच्या माध्यमातून क्षयरोग संशयितांचा शोध घेतला जात असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.