घरताज्या घडामोडीमानखुर्द येथे अग्नितांडव; एकजण जखमी

मानखुर्द येथे अग्नितांडव; एकजण जखमी

Subscribe

मानखुर्द -घाटकोपर लिंक रोड, मानखुर्द मंडाळा, अण्णाभाऊ साठे नगर, येथील कुर्ला भंगार गोदामाला शुक्रवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. केमिकल, ऑईलने भरलेले सुमारे ५०० ते ६०० मोठे कॅन जळाल्याने आगीची प्रचंड भडका उडाला. या आगीमुळे अंदाजे ५० भंगाराची गोदामे जळून खाक झाली. त्यामुळे मोठी वित्तीय हानी झाली. तसेच, आग विझविताना अग्निशमन दलाचे कर्मचारी हरीश नाडकर (४०) हे जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही आग स्तर -३ ची असल्याचे अग्निशमन दलाने जाहीर केले आहे. ही आग विझविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी यांच्या जागेत भूमाफियांनी अतिक्रमण केले असून बेकायदेशीरपणे ऑईलचा साठा करण्याचा प्रकार यातून ही आगीची दुर्घटना घडल्याचा आरोप महापौरांनी केला आहे. यापुढे भूमाफियांचा कायमचा बंदोबस्त कायदेशीर मार्गाने करण्यात येईल, असे महापौरांनी म्हटले आहे.

- Advertisement -

या आगीची भीषणता एवढी होती की, दूर अंतरावरून आगीचा काळाकुट्ट धूर दिसत होता. आगीची घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली होती. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी तेथील तरुण मुले आगीचे चित्रीकरण मोबाईलद्वारे करण्यात गर्क असल्याचे या आगीबाबतच्या सोशल मीडियावरील व्हिडीओवरून दिसून येते. मात्र आगीची तक्रार प्राप्त होताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचे काम तात्काळ हाती घेतले. १३ फायर इंजिन, ११ जंबो वॉटर टॅंकर यांच्या सहाय्याने ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते.

भूमाफिया कारणीभूत – महापौर

या आगीची माहिती मिळताच, महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर सुहास वाडकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. यावेळी महापौरांनी, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आज या ठिकाणी जी आग लागली आहे, ही जागा जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत येत असून याठिकाणी अवैधपणे ऑईलचा साठा करण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या ‘एम/ पूर्व’ विभाग कार्यालयाच्या वतीने तसेच स्थानिक नगरसेविकेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाला वेळोवेळी कळविण्यात आली असल्याचे सांगितले.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने यापूर्वी महापालिका आणि पोलिसांच्या मदतीने अनेक वेळा कारवाई सुद्धा झाली. परंतु कारवाईची पाठ फिरताच पुन्हा भूमाफिया तिथे सक्रिय होऊन अवैध अड्डे स्थापन करीत असतात. त्यातूनच आजची ही दुर्घटना घडली असल्याचे महापौरांनी सांगितले. आजच्या या दुर्घटनेमुळे भूमाफिया टोळीचा सक्त बंदोबस्त करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. आग मानवी वस्तीमध्ये अधिक पसरू नये, यासाठी अग्निशमन दलाच्या वतीने अधिक खबरदारी घेण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले. याप्रसंगी स्थानिक नगरसेविका श्रीमती समीक्षा सक्रे उपस्थित होत्या.


हेही वाचा – एका गुन्ह्यातून सुटका होताच आरोपीला दुसऱ्या गुन्ह्यात अटक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -