मुंबई : मुंबईतील झवेरी बाजार येथील मुंबादेवी मंदिराजवळील एका सहा मजलीचायना बाजार इमारतीला मध्यरात्री भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या 12 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. इमारतीत अडकलेल्या सर्वांना वेळीच बाहेर काढण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. (Five-storied building in Mumbai’s Zaveri Bazar gutted by fire; Residents were evacuated safely)
मिळालेल्या माहितीनुसार, काळबादेवी, झवेरी बाजार,चायना बाजार, धानजी स्ट्रीट, मुंबादेवी मंदिराजवळील तळमजला अधिक सहा मजली ‘रंगारी’ या इमारतीत रहिवाशी गाढ झोपेत असताना मध्यरात्री 1.30 वाजताच्या सुमारास अचानकपणे भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच इमारतीत एकच खळबळ उडाली. रहिवाशांची झोप उडाली. ते काहीसे भयभीत व चिंतीत झाले होते, मात्र एकमेकांना आधार देत ते सुरक्षित ठिकाणी होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव व बचावकार्य केले.
या आगीमुळे पराग चाकणकर (40) ही व्यक्ती हाताला भाजल्याने जखमी झाली आहे. मात्र इमारतीत अडकलेल्या 40 ते 50 रहिवाशांची अग्निशमन दलाने सुखरूप सुटका केल्याने ते बचावले. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास आपली राहती इमारत व त्यातील आपला संसार जळत असताना त्यांना उघड्या डोळ्यांनी पाहावा लागला, त्या भीषण आगीचे नाईलाजाने साक्षीदार व्हावे लागले.
#WATCH | Fire breaks out in a 5-storey building in Mumbai’s Jhaveri Bazar area. More than 12 fire tenders present at the spot. All the people trapped in the building have been evacuated safely. More details are awaited. pic.twitter.com/HqgQYoayFG
— ANI (@ANI) June 9, 2023
सदर आग हळूहळू इमारतीत पसरू लागली. या आगीत इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील छताचा काही भाग तसेच जिन्यांचा काही भाग कोसळला आहे. आग जास्त भडकल्याने अग्निशमन दलाने मध्यरात्री 3.25 वाजता आग स्तर -३ ची म्हणजे अत्यंत भीषण स्वरूपाची असल्याचे जाहीर केले. त्यामुळे अग्निशमन दलाने आग विझविण्यासाठी उपलब्ध यंत्रणेच्या व्यतिरिक्त अतिरिक्त यंत्रणा मदतीला बोलावली होती.
या आगीची माहिती मिळताच आजूबाजूच्या रहिवाशांनीही घटनास्थळी धाव घेतली. आग का व कशी लागली हे जाणून घेण्यासाठी घटनास्थळी काहीशी गर्दी केली होती. मात्र स्थानिक पोलिसांनी त्यांना रोखून धरले होते. अग्निशमन दलाने 12 फायर इंजिन, 8 जंबो वॉटर टॅंकर यांच्या साहाय्याने तब्बल साडेसहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी 7.55 वाजता आगीवर नियंत्रण मिळवले व आग पूर्णपणे विझविली. मात्र आग का व कशी काय लागली याबाबत स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाकडून चौकशी सुरू आहे.