लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांना अन्नधान्याच्या गोष्टींचा तुटवडा जाणवू नये यासाठीच राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. केंद्राच्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या धर्तीवर आधारीत महाराष्ट्रातील जनतेसाठी मुख्यमंत्र्यांच्या नावे योजना सुरू करावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. योजनेअंतर्गत डाळ, साखर, मीठ, खाद्यतेल हे मोफत किंवा सवलतीच्या दराने द्यावे अशी मागणी भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना एका पत्राच्या माध्यमातून केली आहे. लॉकडाऊनसारख्या अत्यंत कठीण कालावधीत जनतेसाठी हा एक मोठा दिलासा असेल असे त्यांनी आपल्या पत्रात नमुद केले आहे.
अनेक ठिकाणी लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय डबघाईला आल्याने अनेकांवर नोकरीचे संकट आले. परिणामी अनेकांचा रोजगारही गेला. सर्वसामान्यांचा रोजगार हरवल्याने अनेक नागरिकांना विविध संकटांचा सामना करावा लागला. अशा संकटकाळात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा म्हणूनच दैनंदिन लागणाऱ्या गोष्टींचा पुरवठा या योजनेअंतर्गत व्हावा अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ५ किलो मोफत तांदुळ प्रत्येक महिन्यापोटी देण्यात येतात. योजनेअंतर्गत २५ मेट्रिक टन धान्याचे वितरण हे १.६२ कोटी ग्राहकांना देण्यात आले. तर रेशनकार्ड नसलेल्यांनाही योजनेअंतर्गत ५ किलो धान्य देण्यात आले. ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे अशा ग्राहकांना १ किलो तूरडाळही देण्यात आली.
नोव्हेंबर २०२० पासून केंद्र शासनाची प्रधानंत्री गरीब कल्याण योजना बंद करण्यात आली आहे. प्रधानंत्री गरीब कल्याण योजनेच्या धर्तीवरच कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही महत्वकांशी योजना राबवल्यास राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील अन्नसुरक्षा योजनेसाठी पात्र असलेल्या गरीब आणि गरजू नागरिकांना मोफत किंवा सवलतीच्या दराने जीवनावश्यक वस्तूंचा (चणाडाळ, तूरडाळ, साखर, खाद्यतेल आणि मीठ) यासारख्या गोष्टींचा पुरवठा करण्याची नितांत गरज आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा लवकरात लवकर करण्यासाठी या योजनेचा निर्णय घ्यावा असेही छगन भुजबळ यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.