3 जुलै २०१८ ला मुंबईत धो- धो पाऊस पडत होता. या दिवशी अंधेरीत गोखले पूलाचा काही भाग कोसळला. सगळ्या मुंबईकरांचे लक्ष या दुर्घटनेने वेधून घेतले. शिवाय धो- धो पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यामुळे एका मुलीचे आयुष्य काही मिनिटात बदलून गेले. सांताक्रूझला राहणारी १७ वर्षीय ऐश्वर्या धो- धो पावसात घरी परतत असताना तिला बसची धडक बसली आणि ती अंथरुणाला खिळली. सध्या ऐश्वर्यावर विलेपार्लेतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नेमकं काय घडलं?
३ जुलैला मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत होता. सांताक्रुझच्या गोळीबार रोड येथील शांतता विकास या इमारतीत राहणारी ऐश्वर्या कॉलेजमधून घरी परतत होती. सांताक्रूझ परिसरात खूप पाणी साचल्याने तिने स्कायवॉक वरुन जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, स्कायवॉक वरुन आलेल्या एका व्यक्तीने तिला तिथून जाऊ नको पुढे खड्डा पडला आहे असा सल्ला दिला. म्हणून ती पुन्हा पाणी साचलेल्या रस्त्यावरुन निघाली. रस्ता ओलांडत असताना समोरुन येणाऱ्या बसने तिला धडक दिली. त्या धडकेत ती रस्त्यावर पडली. ती खाली पडल्यानंतर बस तिच्या एका पायावरुन गेली. या घटनेनंतर तिथल्याच एका मुलीने तिच्या कुटुंबियांना फोन करुन कळवले आणि सांताक्रूझच्या वी.एन. देसाई या रुग्णालयात नेले. पण, रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला तपासून दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिला आर.के रुग्णालयात नेण्यात आले. तिथेही त्यांना खासगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. शेवटी तिच्या आजीने तिला नानावटी या खासगी रुग्णालयात दाखल केले.
ऐश्वर्याला गरज मदतीची
ऐश्वर्याला रुग्णालयात दाखल केल्यापासून शस्त्रक्रिया आणि उपचारांचा मिळून ४ लाख रुपयांचा खर्च आला आहे. नानावटी रुग्णालयाचा खर्च ऐश्वर्याच्या कुटुंबियांना परवडणारा नाही. त्यामुळे तिची बहिण पूजा नंदीवकर हीने फेसबुकवर ‘ऐश्वर्याला मदत करा’ अशी मोहिम राबवली आहे. ऐश्वर्या लहान असतानाच आई-बाबांचे छत्र हरपले. त्यामुळे ती तिच्या आजी आणि काकासोबत सांताक्रूझमध्ये राहते. ऐश्वर्याची आजी शकुंतला वंजारे महिना ७ हजार रुपये कमवतात. पण, त्या एवढा खर्च पेलवू शकत नाही. शिवाय,ऐश्वर्याचा अपघात झाल्यापासून त्या कामावरही जाऊ शकल्या नाहीत.ऐश्वर्याच्या प्रकृती संदर्भात चौकशी केल्यानंतर तिचा काका प्रकाश वंजारे यांनी ऐश्वर्याचे दोन दिवसांपूर्वी मांडीच ऑपरेशन झाल्याचे ‘माय महानगर’ला सांगितले.
ऐश्वर्याच्या कमरेखालच्या भागांना प्रचंड जखमा झाल्या आहेत. ओटीपोट आणि योनीमार्गाच्या भागांवरही शस्त्रक्रिया करण्यात आली. उजव्या पायाची शस्त्रक्रिया केली आहे. दररोज तिच्यावर वेगवेगळे उपचार केले जात आहेत. तिची प्रकृती सुधारतेय. स्त्रीरोगतज्ज्ञ आणि जनरल फिजीशियन यांच्या सल्लानुसार, तिला भविष्यात गर्भधारणा करण्यासाठी काही त्रास होणार नाही.तिला पूर्णपणे बरं होण्यासाठी साधारण सहा महिने लागतील.
-डॉ. सुनील शहाणे ,ऑर्थोपेडिक सर्जन, नानावटी