‘अतिवृष्टीने ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा दिलासा द्या, सरकार म्हणतंय मदत करतो मात्र मदत अद्याप कागदावरच आहे. सरकारचे बोलणेच जास्त आणि कामात शुन्य आहे’, असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे. (Government is helping farmers but only on paper says Jayant Patil)
‘सरकार स्थिर करण्यात, नाराजांची मनधरणी करण्यात, खाते वाटून घेण्यात हे व्यस्त आहेत त्यामुळे शेतकऱ्यांकडे, सामान्य जनतेकडे यांचे दुर्लक्ष आहे’, असा आरोपही जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला. ‘मूळ प्रश्नाकडे बगल देण्यासाठी सिंचन चौकशीच्या वावड्या उठवल्या जात आहेत. १५ वर्षे जुन्या गोष्टी उकरून काढून विरोधकांना बदनाम करण्याची ही चाल आहे. सध्याच्या सरकारचे ते कामच आहे मात्र आम्ही काही घाबरत नाही, आम्ही विरोधक म्हणून आपली जबाबदारी पार पाडू’, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांत राज्याच्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. तसेच, राज्याच्या २१ तालुक्यांत अतिवृष्टी झाल्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुढील पाच दिवस विभागात मुसळधार पाऊस होणार असून, गडचिरोली, चंद्रपूर व गोंदियाला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा नदी नाल्याना काही प्रमाणात पूर आला आहे. तर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आणि घाटांच्या परिसरात पावसाचा जोर अधिक आहे. दरम्यान, मुसळधार पाऊस सुरूच असल्याने वैनगंगा नदीचे मागील पाणी शहरात घुसल्याने अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
हेही वाचा – ‘नशीब आमच्या भाषणावर जीएसटी लावला नाही’; छगन भुजबळांचा उपमुख्यमंत्र्यांना टोला