राज्यासह मुंबईत दिवसागणित कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होत आहे. मुंबईचा दररोजचा आकडा ५ हजारच्यावर असल्याने पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर विविध भाजी मंडईत जाऊन फेरीवाल्यांसह अनेक नागरिकांना मास्क लावण्याचे आवाहन करत होत्या. आता त्यांच्या पाठोपाठ मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख देखील रस्त्यावर उचलून लोकांना आवाहन करत आहे. अस्लम शेख यांनी दादर मार्केटला भेट देत फेरीवाल्यांसह विक्रेत्यांना मास्क लावत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी मुंबईत लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली. विशेष म्हणजे लॉकडाऊन बाबत आजच निर्णय घेण्यात येईल’, असे देखील संकेत त्यांनी दिले आहेत.
आज निर्णय होण्याची शक्यता
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज सकाळपासून मुंबईतील महत्त्वाच्या अशा मार्केटना भेटी दिल्या. त्या दरम्यान ते दादरच्या मार्केटमध्ये देखील आले होते. त्या दरम्यान , दादर मार्केटमधील दृश्य पाहून त्यांनी मुंबईतील कोरोनाची परिस्थिती बिकट झाल्याचे सांगितले. तसेच रुग्णांच्या संख्येत वाढ झाली तर बेड्स कमी पडतील, अशी भिती देखील व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे मुंबईकरांनी नियमांचे पालन करणे फार गरजेचे आहे. अन्यथा याबाबत आजच निर्णय घेण्यात येईल, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्र्यांशी होणार चर्चा
मुंबईतील लॉकडाऊनबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे. या चर्चेनंतर निर्णय घेण्यात येण्याची शक्यता दिसून येत आहे.
विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
मार्च २०२० पासून ते ९ मार्च २०२१ या कालावधीत विना मास्क फिरणाऱ्या १८ लाख ४५ हजार ७७७ नागरिकांवर कारवाई करून तब्बल ३७ कोटी २७ लाख ८५ हजार ६०० रुपये एवढी रक्कम दंड वसुली पोटी जमा केली होती. वास्तविक, मार्च २०२० ते २ एप्रिल २०२१ या कालावधीत विना मास्क फिरणाऱ्यांकडून पालिका, पोलीस, रेल्वे प्रशासन यांनी दंडात्मक कारवाई करून तब्बल ४९ कोटी १५ लाख ४६ हजार ८०० रुपये इतकी रक्कम दंड वसुलीपोटी जमा केली आहे.
हेही वाचा – ‘विना मास्क’ फिरणाऱ्या मुंबईकरांकडून आतापर्यंत ४९ कोटींची दंड वसुली