मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस कायम राहिला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये मंगळवारी १४० ते १५० मिमी पाऊस झाला. उसंत न घेता सलग कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक भाग जलमय झाले आहेत. पावसामुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडले होते. दरम्यान पुढील दोन दिवस मुंबई आणि ठाण्यात पाऊस कायम राहणार आहे.
मुंबई आणि ठाण्यातही जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहर आणि उपनगरांमध्ये सोमवारपासून अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. मुंबई शहर आणि उपनगरांतील वेगवेगळय़ा भागांत मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत, २४ तासांत १४० ते १५० मिमी पाऊस पडला.
Maharashtra | As heavy rainfall lashes city with IMD issuing an orange alert, severe waterlogging recorded in several parts of Mumbai. Visuals from Dadar area pic.twitter.com/7JHRvYb1Wy
— ANI (@ANI) July 6, 2022
पुढचे 4 दिवस पावसाचे –
मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात पुढचे 4 दिवस मुसळधार पाऊस होणार आहे. ठाणे जिल्ह्याला ९ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबईसह उपनगरातील पाऊस मिमी मध्ये –
मुंबई आणि उपनगरात मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला. सकाळी साडेआठ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत भायखळा ८५.५ मिमी, चेंबूर १०६.५ मिमी, जुहू विमानतळ १४२.५ मिमी, विद्याविहार १५९ मिमी, सहार विमानतळ १४९.५ मिमी, वांद्रे १३८ मिमी, गोरेगाव १२५.५ मिमी, जुहू १२३ मिमी, पावसाची नोंद झाली.
पाणीसाठा –
पावसामुळे मंगळवारी सकाळपर्यंत तलावांमध्ये सुमारे २० हजार ८५९ दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली. मुंबईला अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी तलाव क्षेत्रात सोमवारी दिवसभरात १४ मिमी, ५६ मिमी, ७८ मिमी, ३१ मिमी, ६१ मिमी, ११९ मिमी व २२७ मिमी पाऊस पडला. त्यामुळे जलसाठय़ात भर पडल्याची माहिती मिळाली आहे.