राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दिवसागणिक रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत असून अनेक सुविधांचा तुटवडा भासत आहे. यापैकी महत्त्वाचे म्हणजे कोरोना लस, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शन. सध्या या तिन्ही गोष्टींचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत आहे. त्यामुळे परराज्यातून आणि अनेक देशातून ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध केले जात आहे. दरम्यान आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे मनपा आयुक्त इक्बाल चहल यांच्याकडून हायअलर्ट देण्यात आला आहे. नवी मुंबईच्या तळोजा येथील लिंडे कंपनीच्या ऑक्सिजन प्लांटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईला पुढील २ दिवस ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सर्व रुग्णालयांना अलर्ट राहण्याची सूचना मुंबई महापालिकेकडून देण्यात आली. पण आता मनपाने प्लॅन बी तयार केला आहे. परंतु मनपा आयुक्त इकबाल चहल यांच्या दाव्यावर लिंडे कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. कंपनीमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाला नसल्याचे लिंडे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
मुंबईला सध्या आयनोक्स कंपनीकडून १३० मॅट्रिक टन, लिंडे कंपनीकडून १०३ मॅट्रिक टन ऑक्सिजन पुरवला जातोय. पण आता तळोजामधील लिंडे कंपनीत तांत्रित बिघाड झाल्यामुळे मुंबई महापालिकेचा ऑक्सिजन तुटवड्याबाबत बी प्लॅन तयार असल्याचे कळत आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील जिंदाल कंपनीकडून मुंबईला ऑक्सिजनची मदत होणार असून १०३ मॅट्रिक टन एवढा ऑक्सिजन पुरवला जाणार आहे. माहितीनुसार पुढच्या २ ते ३ तासांमध्ये हा प्लॅन कार्यान्वित होईल असे समजत आहे. सध्या मुंबईत दिवसाला २३५ मॅट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे.
परंतु आयुक्त इक्बाल सिंह यांच्या दाव्यानंतर काही तासांत लिंडे कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मुंबईत कोणताही ऑक्सिजनचा तुटवडा नाही. तसेच कंपनीत कोणताही तांत्रित बदल नाही, असे लिंडे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा – Corona Vaccination : घरोघरी जाऊन लस देण्याचा तुर्तास विचार नाही, सध्या दुसऱ्या डोसला प्राधान्य – महापौर