देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यात पार्श्वभूमीवर कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे येत्या काळात पुन्हा एकदा कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच भितीने दुसऱ्या राज्यातून आलेले स्थलांतरीत मजूरांनी पुन्हा एकदा आपल्या घराची वाट धरली आहे. लॉकडाईऊनची घोषणा होऊन पुन्हा एकदा वाईट परिस्थितीचा सामना करावा लागेल या भितीने मजूर पुन्हा गावी परतत आहे. मंगळवारी कुर्ल्याच्या एलटीटी स्थानकाबाहेर प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली होती. आपल्या गावी परतण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजूर दिसून आले.
बुधवारपासून पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. दुसऱ्या राज्यातील मजूरांना पुन्हा एकदा त्यांच्या गावी जाण्यासाठी एलटीटी स्थानकातून काही महत्त्वाच्या गाड्या सुटतात. मात्र लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गावी परतणाऱ्या मजुरांसाठी एलटीटी स्थानकातून काही स्पेशल रेल्वे रवाना होणार आहेत. मंगळवारी कुर्ला एलटीटी स्थानकातून एकूण २३ रेल्वे रवाना झाल्या. या रेल्वेमधून मुंबईत काम करणारे स्थलांतरीत मजूर आणि कामगार यांची मोठी संख्या पहायला मिळाली.
दर वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात काही विशेष रेल्वे सोडण्यात येतात. त्यामुळे उन्हाळ्यात गावी जाणाऱ्यांची मोठी संख्या असते मात्र मंगळवारी या रेल्वेंना नेहमीपेक्षा जास्त गर्दी पहायला मिळाली. अचानक ही गर्दी वाढली असल्याचे मध्य रेल्वेच्या प्रमुख जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले. कुर्ला स्टेशनच्या बाहेर प्रवाशांनी केलेल्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम धाब्यावर बसवण्यात आले. यानंतर अशा प्रकारची गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत मजूरांना मोठ्या संकटांना समोरे जावे लागले होते. त्यांच्या राहण्याचा आणि जगण्याच प्रश्न निर्माण झाला होता. तिच परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून कामासाठी मुंबईतील स्थलांतरीत मजूर वेळीच आपल्या घरची वाट धरत आहेत.
हेही वाचा – चिंताजनक! ७ दिवसात २७९ पोलिसांना कोरोनाची लागण