मुंबईः मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्हीही राजीनामा द्या आणि वरळीतून माझ्याविरोधात निवडणूक लढवा, असं खुलं आव्हान शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी दिलं आहे. मुंबईतल्या चेंबूरमधील एका कार्यकर्त्याला शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी उपस्थिती दर्शवली होती, त्यावेळी ते बोलत होते.
मी राजीनामा देण्यासाठी तयार आहे. माझ्यासमोर एकनाथ शिंदेंनी वरळीतून उभं राहावं आणि निवडणूक लढवावी. तसेच जेवढे खोके वाटायचे ते वाटा, पण एकसुद्धा मत विकलं जाणार नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणालेत. राज्यात 13 खासदार आणि 40 आमदारांनी गद्दारी केली. मी त्यांना आज आव्हान देत आहे. तुम्ही एकदा आमदारकी आणि खासदारकीचा राजीनामा देण्याची हिंमत दाखवा, मग पुन्हा निवडून कसे येता ते दाखवाच. मी तर घटनाबाह्य असलेल्या मुख्यमंत्र्यांनाही माझ्याविरोधात लढण्याचं आव्हान दिलेलं असल्याचं सांगत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय.
शिवसेनेत शिंदे गटाच्या रूपानं उभी फूट पडल्यानंतर कायमच ठाकरे आणि शिंदे एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोप करत असतात. शिंदे गटानं ठाकरे गटाचे बरेचशे कार्यकर्ते आपल्या गळाला लावले आहेत. त्यावरून दोन्ही गटांमध्ये वादावादी सुरू असते. तर अनेकदा खुली आव्हानंही देण्यात येत असतात. अशातच सध्या राजकीय वर्तुळात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या आव्हानाची जोरदार चर्चा रंगली आहे.
विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदे गटाकडून ठाकरे गटाला धक्का देण्याचा प्रयत्न सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना वरळी मतदारसंघात शिंदे गटाने मोठा धक्का दिला होता. तो म्हणजे वरळीतील माजी नगरसेवक संतोष खरात यांनी ठाकरेंना रामराम ठोकत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला होता. तसेच संतोष खरात यांनीसुद्धा शिंदे गटात गेल्यानंतर प्रतिक्रिया दिली होती. माझी कुणावरही नाराजी नाही. माझी एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. तेव्हा मी त्यांना सर्व सांगितलं होतं. तेव्हा ते म्हणाले, आपण एकत्र काम करू. त्यानंतर मी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केल्याची माहिती संतोष खरात यांनी दिलीय.
हेही वाचाः शिंदे गटाला विश्वासात न घेतल्यानेच भाजपचा अमरावतीत पराभव; संजय गायकवाडांचं मोठं विधान