मुंबई : मुंबई महापालिकेत सहाय्यक आयुक्तांची पदे सध्या प्रभारी कार्यभार देऊन चालवली जात आहेत. ही पदे लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्याची जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाची असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या पदांवर कार्यकारी अभियंत्यांची तात्पुरती नियुक्ती केली जात आहे. हा प्रशासन खिळखिळे करण्याचा डाव असल्याची टीका करत ही पदे लवकरात लवकर भरण्याची मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. (Immediately fill the posts of municipal officials Varsha Gaikwads demand to the Chief Minister)
हेही वाचा – आरक्षणाच्या कमाल मर्यादेवर काँग्रेसची भूमिका स्पष्ट; कार्यसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
मुंबई महापालिकेतील सहाय्यक आयुक्तांच्या जागा लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा नियम आहे. यात बाहेरील 50 टक्के उमेदवार आणि पालिकेच्या सेवेत असलेल्या अधिकारी-कर्मचारी वर्गातून 50 टक्के उमेदवार यांची परीक्षेद्वारे सहाय्यक आयुक्तपदी निवड केली जाते. मात्र, सध्या 24 विभाग कार्यालयांमधील जवळपास नऊ प्रभागांमधील सहाय्यक आयुक्तांची पदे रिक्त आहेत. त्या जागी कार्यकारी अभियंत्यांना तात्पुरती जबाबदारी देत प्रभारी सहाय्यक आयुक्त म्हणून नेमले आहे, याकडे गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
ही नियुक्ती सेवाज्येष्ठतेनुसार झाली असली, तरी नियमित सहाय्यक आयुक्त आणि प्रभारी सहाय्यक आयुक्त यांच्या कामात फरक पडतो. याचा परिणाम विभागांमधील सेवा-सुविधांच्या कामांवर होतो. तसेच ही नेमणूक प्रभारी असल्याने विभागातील इतर अधिकारी अथवा कर्मचारीही या प्रभारी सहाय्यक आयुक्तांचे आदेश गांभीर्याने घेत नाहीत, असे गायकवाड यांनी पत्रात नमूद केले आहे.़
मुंबई महापालिकेचा कारभाराची व्याप्ती मोठी आहे. कोट्यवधी लोकांच्या दैनंदिन आयुष्यावर पालिकेच्या कामाचा परिणाम होतो. अशावेळी सहाय्यक आयुक्त यासारख्या महत्त्वाच्या पदावर नियमित अधिकारी नसणे, हे प्रशासन खिळखिळे करणारे आहे. त्यामुळे याबाबत तातडीने कार्यवाही करून योग्य ते आदेश द्यावेत, अशी विनंती वर्षा गायकवाड यांनी पत्रात केली आहे.