‘गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया…गणपती निघाले गावाला…चैन पडेना आम्हाला’ असा श्री गणेशाचा जयघोष करीत ढोलताशा गजरात गणेश भक्तांनी ठेका धरून गुरुवारी रात्री पहाटेपर्यंत मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या भक्तिमय वातावरणात भिवंडीतील विविध परिसरातील बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. भिवंडी शहर परिसरातील सार्वजनिक आणि घरगुती अशा ६ हजार २६७ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. मात्र, मागील वर्षांपेक्षा यावर्षी दहा दिवसीय गणपतींच्या संख्येत पाच हजारांनी घट झाल्याचे समोर आले आहे.
११ दिवसीय गणपतींची संख्या ५ हजाराने घटली
भिवंडी परिसरात दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा केल्या जाणाऱ्या गणपती बाप्पांच्या भक्तीमय वातावरणात तल्लीन झालेल्या गणेश भक्तांना गणरायाला निरोप देताना त्यांचा कंठ दाटून आला होता. भिवंडी शहरासह ग्रामीण भागातील गणेश भक्तांनी नारपोली, कारिवली तलाव, टिळक घाट, नदीनाका, भादवड, वराळदेवी तलाव, खोणी गाव, कोनगाव, टेंभवली, जू-नांदुर्खी, अंजूर, दिवे, माणकोली, पिंपळास, दापोडे, खारबाव रेती बंदर, काल्हेर रेती बंदर, अंबाडी, पहारे, वज्रेश्वरी, गणेशपरी, अकलोलीकुंड, दुगाड, पडघा (कुंभेरी नदी ) , दाभाड, खंबाळा आदी परिसरातील गणपती बाप्पांचे तलाव, नदी, ओढे, नाल्यांच्या डोहांमध्ये विसर्जन करण्यात येऊन मोठ्या भक्ती भावाने गणपती बाप्पांना निरोप दिला. भिवंडीत गणपतींचे विसर्जन पहाटे २ वाजेपर्यंत सुरु होते. शहर महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने शिवाजीचौक येथे स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. याठिकाणी महापौर जावेद दळवी, आमदार महेश चौघुले, रूपेश म्हात्रे, आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर आदींच्या उपस्थितीत गणेश मंडळांचे विशेष स्वागत करण्यात येत होते. पालिका प्रशासनाने कामवारी नदीच्या टिळक घाट, शेलार नदीनाका, वराळदेवी तलाव येथे मोठमोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी खास तराफ्यांची व्यवस्था केल्याने गणेश भक्तांनी बाप्पांचे सुरळीतपणे विसर्जन केले. या गणपती विसर्जनादरम्यान अनुचित प्रकार घडू, नये यासाठी ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हेही वाचा – ठाण्यात ३७ हजार ३६१ मूर्तींचे विसर्जन