नवी मुंबई:- फिफाचे सामने होऊन एक वर्ष उलटत नाही तोच पुन्हा मनपाने याच मार्गावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला होणार्या सुशोभीकरणाचा लाखो रुपयांचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या महासभेत आणला. त्यामुळे अनेक नगरसेवकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. मात्र त्यांची नाराजी दूर करत हा प्रस्ताव संमत करण्यात आल्याने तब्बल ६० लाखांचा, करदात्यांच्या पैशाचा चुराडा होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या अगोदर फिफादरम्यान १४ ते १५ करोड रुपये खर्च करून या मार्गावर शुशोभीकरण करण्यात आले होते. आताही त्याच मार्गावर पुन्हा ६० लाखाहून अधिक खर्च का करावा लागतो,असे सांगत याप्रकरणी मला युडीआयमध्ये तक्रार करायला लाऊ नका असा इशारा राष्ट्रवादीचे माजी स्थायी समिती सदस्य अशोक गावडे यांनी दिला.
एक वर्षापूर्वी नेरूळ मधील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडीयममध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल (फिफा) सामने झाले. त्यावेळी मनपाने कोट्यवधी रुपये खर्च करून स्टेडियम मार्गावरील रस्त्याचे सुशोभिकरण केले होते. त्यानंतर पुन्हा एलपी ते जुईनगर रेल्वे स्टेशन या मार्गावर फेन्सिग करून परिसराचे सुशोभिकरण करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या महासभेत आला. या कामासाठी तब्बल ७४ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. नवी मुंबईच्या प्रवेशद्वारावर सदरील खर्च करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले असता यावर सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
नवी मुंबईचे प्रवेशद्वार हे जुईनगर आहे की वाशी असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादीच्या दिव्या गायकवाड यांनी वाशी ते बेलापूरपर्यंतचा सर्व रस्ता सुशोभित करावा अशी मागणी केली. त्याचवेळी गावडे यांनीही प्रशासनावर आसूड ओढले. फेन्सिंग व सुशोभिकरणाचा प्रस्ताव पाच महिन्यांपूर्वी महासभेत मंजूर झाला होता.त्यानंतर तो आज पुन्हा स्थायी समिती सभेत मंजुरीसाठी आला. हाच प्रस्ताव या ठिकाणी यायला पाच महिने लागले. इतका उशीर चांगले प्रस्ताव यायला का लागतो, असा थेट प्रश्न गावडे यांनी प्रशासनाला केला.
याच मार्गावर फिफा सामन्यांच्या वेळी १४ ते १५ कोटी रुपये खर्च करून सुशोभिकरण करण्यात आले होते. तो सर्व खर्च मातीमोल ठरला का? मग पुन्हा ७० लाख रुपये खर्च करून याच मार्गावर काम करण्यात येणार आहे.जनतेचा पैसा अखेर मातीत जात असेल तर या प्रकरणाची तक्रार मला युडीआयकडे करावी लागेल असा इशारा गावडे यांनी प्रशासनाला दिला. नेरूळ रेल्वे स्थानक ते सी-वूड रेल्वे स्थानकादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला अत्यंत गलिच्छ परिस्थिती असताना त्यावर सुधारणा व्हावी म्हणून मी गेल्या अनेक वर्षापसून मनपा कडे पाठपुरावा करत आहे.त्यावर कोणीही लक्ष देत नसल्याने तेथील परिस्थिती अजूनच खराब आहे.