बेळगावसह सीमाभागात आज, १ नोव्हेंबर रोजी काळा दिवस पाळण्यात येतो. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जनतेला आवाहन करताना, आमचा मराठी माणसाचा सीमाभाग लवकरच महाराष्ट्रात सामील होईल, अशी खात्री व्यक्त केली आहे. कर्नाटकरात मराठी बांधवांवर होणारा अन्याय, अत्याचाराचा निषेध मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नोंदवण्यात आला. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी हाताला काळी फित लावून निषेध व्यक्त केला.
सीमाभागातील मराठी भाषिकांना पाठिंबा म्हणून काळी फित बांधत कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा आम्ही निषेध करत आहोत. बेळगाव मधील मराठी भाषिकांचा विजय होईल, याचा आम्हाला विश्वास आहे.@NCPspeaks pic.twitter.com/DfrzVFm9FV
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) November 1, 2020
राज्य सरकारमधील सर्व मंत्री आज निषेध व्यक्त करत असल्याचे यावेळी जयंत पाटील म्हणाले. दरम्यान, राज्यातील जनता सीमा भागातील मराठी भाषिक लोकांच्या मागे पूर्ण ताकदीने उभी आहे. सुप्रीम कोर्टात हे प्रकरण प्रलंबित असले तरी कर्नाटकमधील मराठी बांधवांवरील अन्याय थांबलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस त्याचा निषेध नोंदवत असल्याचे जयंत पाटील यांनी नमूद केले.
दरवर्षीप्रमाणे आजही काळा दिन रॅलीला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली आहे. सोबतच काळे कपडे घालायलाही मनाई करण्यात आली आहे. मात्र, ही बंदी झुगारून सीमा भागातील मराठी बांधव मराठा भवन येथे एकत्र आले. यावेळी त्यांनी मराठी भाषिकांवर होणाऱ्या दडपशाहीचा निषेध नोंदवला. सूर्य-चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच असेल असे म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री सवदी यांचाही मराठी भाषिकांनी चांगलाच समाचार घेण्यात आला. शिवाय सीमाप्रश्नी अग्रेसर असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रात सत्तेत आहेत. त्यामुळे हा प्रश्न आतातरी तडीस लागेल, अशी आशा या मराठी भाषिकांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा –
Corona लसीकरणावर लक्ष ठेवण्यासाठी त्रिस्तरीय समिती स्थापन करा, केंद्राचे राज्यांना निर्देश