कोरोनाच्या संदर्भात लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता तसेच त्यांचे सहकार्य न घेता केवळ आपत्कालिन व्यवस्थापन कायद्यानुसार काम करत लोकप्रतिनिधींचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कान नवनियुक्त आयुक्त पकडले. कोणत्याही प्रकारचे संकट हे लोकप्रतिनिधींच्या सहकार्याशिवाय पार पडू शकत नाही, याची जाणीव करून सर्व सहाय्यक आयुक्तांना करून देत त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. विशेष म्हणजे आजवर ज्या ज्या भागांमध्ये लोकप्रतिनिधींचे सहाय्यक आयुक्तांना सहकार्य लाभले आहे, तेथील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात राखण्यात प्रशासनाला यश आले आहे, असे निरीक्षण समोर आले आहे.
महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी महापालिकेच्या वरिष्ठ व अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेवून कोरोनासंदर्भात उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी बाधित क्षेत्र अर्थात ‘कंटेनमेंट झोन’ याबाबतची कार्यवाही अधिक प्रभावी व्हावी व यासाठी प्रत्येक बाधित क्षेत्रासाठी ‘समन्वयक’ म्हणून कोविड योद्ध्यांची नेमणूक तात्पुरत्या स्वरूपात करण्याचे निर्देश दिले. बाधित क्षेत्राबाबत काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. याचे ‘फलनिष्पती केंद्रीत प्रभावी व्यवस्थापन’ व्हायला हवे.
प्रभावी व्यवस्थापनासाठी या क्षेत्राचे सुसूत्रीकरण करण्याचीही गरज आहे. तसेच या क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाची तपासणी व्हायला हवी. यासाठी पोलिसांच्या स्तरावर आवश्यक तो समन्वय नियमितपणे साधावा, असेही निर्देश दिले. तसेच या बाधित क्षेत्रांमध्ये आवश्यक त्या जीवनावश्यक वस्तूंचा यथायोग्य पुरवठा होत असल्याची खातरजमा वेळोवेळी करून घ्यावी. विभागस्तरीय कार्यवाहीच्या अनुषंगाने मुंबई पोलीस, एस आर पी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण इत्यादी शासकीय व निमशासकीय संस्थांच्या स्तरावर नियमितपणे संपर्क व समन्वय साधण्याचे निर्देश दिले.
मुंबईत २०० रुग्णवाहिकांचे नियोजन
मुंबईतील १०० कोविड केंद्रांवर प्रत्येकी दोन याप्रमाणे २०० रुग्णवाहिकांचे नियोजन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी भाजपचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी प्रत्येक विभाग कार्यालयांमध्ये मृत कोविड बाधित व्यक्तीस नेण्यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा करण्याची मागणी केल होती. रुग्णवाहिकेअभावी कोविड बाधित रुग्णांना रुग्णालयात नेण्यास तसेच मृतांना अंत्यसंस्कारासाठी नेण्यास अडचणी येत असल्याने गंगाधरे यांनी ही मागणी केली होती.