घरमुंबई२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याची फेरचौकशी करा

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याची फेरचौकशी करा

Subscribe

भाजप आमदार अतुल भातखळकर यांची मागणी

मुंबई पोलीस दलाचे निवृत्त पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी आपल्या आत्मचरित्रात पाकिस्तानी दहशतवादी कसाबला हिंदू दहशतवादी म्हणून दाखवण्याच्या संदर्भातला जो खुलासा केला आहे, या खुलाशाच्या पार्श्वभूमीवर २६/११च्या संपूर्ण प्रकरणाची फेरचौकशी करावी, अशी मागणी कांदिवली पूर्व विधानसभेचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केली आहे.

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे या सगळ्यांना कसाबने मारलेले नसून हिंदू दहशतवाद्यांनी मारले अशा प्रकारचा प्रचंड खोटा आणि गलिच्छ प्रचार देशातील त्यावेळच्या काँग्रेसच्या नेत्यांनी व काही विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी केला होता ही वस्तुस्थिती आहे, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आयएसआय ही दहशतवादी संघटना कसाबला हिंदू दहशतवादी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत होती, हा तत्कालीन पोलीस आयुक्तांचा खुलासा आहे ज्यांनी या प्रकरणाची चौकशी केली होती. त्याच वेळेला या देशातले काही लोक या संदर्भाच्या दिशेने लिखाण करत होते आणि तशा प्रकारच्या मागण्या करत होते हे अत्यंत धक्कादायक असून राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित असे हे प्रकरण आहे. त्यामुळे या सर्व लोकांची या संदर्भातली सखोल चौकशी करण्याची मागणी अतुल भातखळकर यांनी पत्रात केली आहे.

- Advertisement -

या हल्ल्याची चौकशी करण्याच्या संदर्भात तत्कालीन सरकारने निवृत्त गृह सचिव राम प्रधान यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली होती. या समितीचा अहवाल हा तत्कालीन सरकारने विधिमंडळासमोर पूर्णपणे सादर केला नव्हता. २६/११ च्या हल्ल्याला १० वर्षे पूर्ण झाल्यानंतर एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्वतः राम प्रधान यांनी हे मान्य केले की, त्या हल्ल्यात जे लोकल कनेक्शन मिळत होते ते लोकल कनेक्शन तुम्ही उघड करू नका, अशा प्रकारचा आदेश तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आपल्याला दिला आणि हे सुद्धा या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे आहे.

त्याचबरोबर तत्कालीन राज्य सरकारच्या एका काँग्रेसच्या वरिष्ठ मंत्र्यांनी सुद्धा त्या वेळेला हा जाहीर आरोप केला होता की, या हल्ल्यात काँग्रेसचेच नेते सहभागी आहेत. त्याचबरोबर केंद्रातल्या एका काँग्रेसच्या मंत्र्यांनी सुद्धा २६/११चा हल्ला हा हिंदू दहशतवाद्यांचा कट आहे अशा प्रकारचा आरोप केला होता, असे भातखळकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. या दहशतवादी हल्ल्यात दोनशेपेक्षा अधिक लोकांचा बळी गेला, अनेक पोलीस अधिकारी शहीद झाले अशा सर्व प्रकरणाचा या दृष्टिकोनातून तातडीने ताबडतोब कालबद्ध मर्यादेमध्ये तपास करावा व पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळून देशद्रोही भूमिका घेणार्‍यांची चौकशी करावी, अशी मागणी भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान, आजच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी आपण हा योग्य राष्ट्रवादी निर्णय घ्याल अशी आशा बाळगतो, असेही त्यांनी म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -