स्वर्गीय शिवसेना प्रमुख यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजनासाठी राजकीय वर्तुळातील अनेक बड्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आले नाही. यावरुन राजकीय चर्चांना उधाण आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याप स्मारकाच्या भूमिपूजनाचा सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थित पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते स्मारकाचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि बाळासाहेब यांचे पुतणे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आले नाही. यावर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. भूमिपूजन कोण करतंय हे महत्त्वाचं नाही तर भावना महत्त्वाची आहे. असे संदीप देशपांडे यांनी केले आहे.
संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, स्वर्गीय मा.बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम हे राजसाहेबच करत आहेत हीच मराठी माणसाची भावना आहे. आणि तीच महत्वाची. बाकी भूमिपूजन कोण करतंय महत्वाचं नाही.
स्वर्गीय मा.बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम हे राजसाहेबच करत आहेत हीच मराठी माणसाची भावना आहे. आणि तीच महत्वाची. बाकी भूमिपूजन कोण करतंय महत्वाचं नाही.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 31, 2021
राज ठाकरे, फडणवीसांना निमंत्रण द्यायला हवे होते
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे की, शिवसेनेला इतरांना महत्त्व द्यावे असे वाटत नसेल. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना सर्व पक्षीय नेत्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न झाला होता. हे बाळासाहेबांच्या स्मारकाचे काम आहे. ही वास्तु चिरंतर टीकणारी त्यामुळे अशावेळी बोलावले असते तर त्या कार्यक्रमाची उंची निश्चित राहिली असती कारण बाळासाहेब हे सर्वांचे आवडते होते. परंतु राजकारण एवढे टोकाला पोहचले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीव्यतिरिक्त कोणालाही बोलाविले नसावे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे घरातील व्यक्ती होते. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी या स्मारकासाठी सतत पुढाकार घेतला, सरकारी परवानग्या घेतल्या होत्या त्यांचे मोठे योगदान होते तर त्यांना निमंत्रित करायला हवे होते असे विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.