मुंबईच्या डोंगरी भागात आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास केसरबाई इमारत कोसळली असून ही दुर्घटना सरकारच्या हलगर्जीपणामुळे घडली आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. डोंगरीच्या तांडेल स्ट्रीटवर असलेली केसरबाई इमारत कोसळून झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पाऊस सुरु झाला की मुंबईत दुर्घटनांची साखळी सुरू होते. पण यावर्षी तर कहर झाला असून गटारात पडून माणसे वाहून जात आहेत. तर भिंत कोसळून अनेकांना जीव गमवावा लागत आहे. पण सरकार आणि पालिकेचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे, असेही जयंत पाटील म्हणाले आहेत. तर धोकादायक इमारतींवर कारवाई करून लोकांचे पुनर्वसन करण्याची बाब अधिवेशनकाळात सरकारच्या निदर्शनास आणून दिली होती. परंतु या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सरकार निवडणुकीत गुंतलेले आहे. ही सरकारची अक्षम्य चूक आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.
लहान गल्ली, दाट गर्दी; बचावकार्यास प्रचंड अडचणी
मुंबईच्या डोंगरी भागात सकाळी अकरा वाजेच्या सुमारास केसरबाई इमारत कोसळली. हा परिसर अत्यंत दाट वस्तीचा. सीएसएमटी स्थानकाच्या अगदी हाकेच्या अंतरावर परिसर असल्यामुळे परिसरात नेहमी गर्दी. याशिवाय परिसरात फार जुन्या जीर्ण झालेल्या आणि दाटीच्या इमारती आहेत. या इमारतीत १५ कुटुंब राहत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र, छोट्या गल्ल्या असल्यामुळे अग्निशमनदलापुढील आव्हान वाढले आहे. घटनेस्थळी एनडीआरएफचे जवान बचाव कार्यसाठी दाखल झाले आहेत. दरम्यान, दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रचंड खटाटोप केली. स्थानिक नागरिक आपापल्या परिने विटा आणि सामान उचलत होते. मात्र, तितक्यावर शक्य नाही.
हेही वाचा – Dongaribuildingcollapse: ‘जे केसरबाईत घडले ते उद्या आमच्यासोबतही घडू शकते’