सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद सध्या तिच्या कपड्यांमुळे वादात सापडली आहे. तिच्या कपड्यांवरून अनेकांनी तिला टार्गेट केले. सोशल मीडियावरचं नाही तर राज्याच्या राजकारणात आता उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांचा मुद्दा गाजतोय. उर्फी सार्वजनिक ठिकाणीही अतिशय तोकड्या कपड्यात फिरते. त्यामुळे पब्लिसिटी स्टंटसाठी ती असं करत असल्याचे अनेकांचे मत आहे. यावरूनच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला टार्गेट केले आहे. मागील अनेक दिवसांपासून दोघींमध्ये सध्या सोशल मीडियावरून शाब्दिक वाद सुरु आहे.
या प्रकरणात उर्फीवर महिला आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली परंतु अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी कारवाई करून वेळ वाया घालवणार नाही असा महिला आयोगाचा दावा असल्याचं चित्रा वाघ यांनी सांगितलं. उर्फी प्रकरणात चित्रा वाघ यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाबाबत समाजात अविश्वास निर्माण केल्याबद्दल आयोगाने त्यांना नोटीस बजावली होती. दरम्यान, आता या वादात आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे.
जितेंद्र आव्हाड यांचं ट्वीट चर्चेत
ह्याचे कुणी उत्तर देईल का कि 5000 वर्ष क्षुद्र स्त्रियांना वक्ष म्हणजेच उरोज प्रथे प्रमाणे झाकताच येत नव्हते … घटकंचुकी ची माहिती द्या कि नव्या पिढीला .. कमीतकमी आजच्या स्त्रियांना मना प्रमाणे वागता तरी येते .. 5000 वर्ष स्त्री हि उपभोगाची वस्तू म्हणून उपभोगणार्यांनी भुंकू नये
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 8, 2023
उर्फी प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांनी लिहिलंय की, “ह्याचे कुणी उत्तर देईल का कि 5000 वर्ष क्षुद्र स्त्रियांना वक्ष म्हणजेच उरोज प्रथे प्रमाणे झाकताच येत नव्हते… घटकंचुकी ची माहिती द्या कि नव्या पिढीला .. कमीतकमी आजच्या स्त्रियांना मना प्रमाणे वागता तरी येते .. 5000 वर्ष स्त्री हि उपभोगाची वस्तू म्हणून उपभोगणार्यांनी भुंकू नये” दरम्यान, आता हा वाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.