मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेची कसारा ते आसनगावपर्यंत वाहतूक आज सकाळी विस्कळीत झाली आहे. खर्डी रेल्वे स्थानकाजवळ दुरांतो एक्सप्रेसचं इंजिन फेल झाल्याने तासाभरापासून येथील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. यामुळे कसाऱ्याहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे मोठ्याप्रमाणात हाल होत आहे.
दरम्यान दुसरीकडे रेल्वे प्रशासनाकडून दुरांतो एक्सप्रेसला दुसरं इंजिन जोडण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. ऐन गर्दीच्या वेळेत बिघाड झाल्याने कामाला निघालेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. उशीराने सुरु असलेल्या रेल्वे वेळपत्रकामुळे मुंबईच्या दिशेने येणारे प्रवासी आता बस आणि इतर खासगी वाहनांचा पर्याय निवडत आहेत. दरम्यान ही रेल्वे वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहे.