घरताज्या घडामोडीपावसाळ्यात वाढतोय लेप्टोचा धोका, 'अशी' घ्या काळजी!

पावसाळ्यात वाढतोय लेप्टोचा धोका, ‘अशी’ घ्या काळजी!

Subscribe

पावसाच्या पाण्यातून चालल्यास लेप्टोची शक्यता अधिक

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. यासारख्या पावसानंतर महापालिका क्षेत्रात लेप्टोच्या (Leptospirosis) रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे यापूर्वीच्या अनुभवावरुन दिसून येते. ही बाब लक्षात घेऊन ज्या व्यक्ती गम बूट वापरण्यासारखी खबरदारी न घेता पावसाच्या पाण्यातून चालत गेल्या होत्या, त्यांना लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता असते. तर जखम / जखमा / खरचटलेला भाग असलेल्या ज्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आला असेल, अशा व्यक्तींना लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच पावसाच्या पाण्याशी संपर्क आलेल्या व्यक्तींनी २४ ते ७२ तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार करणे (Preventionary Medication) आवश्यक आहे, अशी अत्यंत महत्त्वाची सूचना महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केली आहे.

अतिवृष्टी दरम्यान पावसाच्या साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून नागरिकांना चालावे लागते. याच पाण्यात ‘लेप्टोस्पायरोसिस’या रोगाचे ‘लेप्टोस्पायरा’ (स्पायराकिट्स) या सूक्ष्मजंतूचा प्रादूर्भाव असू शकतो. उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी इत्यादी प्राण्यांच्या लघवीद्वारे (मूत्रातून) लेप्टोचे सूक्ष्मजंतु पावसाच्या पाण्यात संसर्गीत होतात. अशा बाधीत झालेल्या पाण्याशी माणसाचा संपर्क आल्यास त्याला लेप्टोची बाधा होण्याची शक्यता असते. तसेच व्यक्तीच्या पायाला किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला जखम असेल, अथवा साधे खरचटलेले जरी असेल; तरी अशा छोट्याश्या जखमेतून सुद्धा लेप्टोचे जंतू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे ज्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आला असेल, त्यांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार करावेत, असे आवाहन डॉ. गोमारे यांनी केले आहे.

- Advertisement -

‘लेप्टोस्पायरोसिस’बाबत महत्त्वाची माहिती

ज्या व्यक्ती पुराच्या पाण्यातून एकदाच चालल्या आहेत, त्या व्यक्ती लेप्टोच्या अनुषंगाने ‘कमी जोखीम’या गटात मोडतात.

एकदाच पुराच्या पाण्यातून चाललेल्या पण अंगावर किंवा पायावर जखम असलेल्या किंवा चुकून पुराचे पाणी तोंडात गेलेल्या व्यक्ती या ‘मध्यम जोखीम’या सदरात येतात.

- Advertisement -

अर्धातासापेक्षा अधिक काळ पुराच्या पाण्यातून चालल्यास किंवा सतत पुराच्या पाण्याशी संपर्क आल्यास अशा व्यक्ती ‘अतिजोखीम’या गटात मोडतात.

‘लेप्टोस्पायरोसिस’हा रोग ‘लेप्टोस्पायरा’ (स्पायराकिटस) या सूक्ष्मजंतुमुळे होतो. उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी, बैल तसेच इतर काही प्राणी या रोगाचे स्रोत आहेत.

बाधित प्राण्यांच्या लघवीद्वारे संसर्गित झालेल्या पाण्याशी संबंध येताच मनुष्याला ‘लेप्टोस्पायरोसिस’या रोगाची बाधा होऊ शकते. निरनिराळ्या प्रकारची जनावरे सदर सूक्ष्मजंतुचे वाहक असतात. पण त्यांच्यात सदर रोगाची लक्षणे दिसून येत नाहीत.

मनुष्यापासून मनुष्याला लेप्टोच्या संसर्गाची बाधा होत नाही.

शहरी विभागात लेप्टोस्पायरा हे सूक्ष्मजंतु उंदीर, कुत्रे इत्यादी प्राण्यांमध्ये आढळतात. संसर्गित जनावरांच्या मुत्राद्वारे दूषित झालेले पाणी वा माती यामार्फत मनुष्याला संसर्ग होतो. हा संसर्ग जखम झालेली त्वचा, डोळे, नाक याद्वारे होतो.

पावसाळ्यात व पूर आल्यानंतर किंवा अतिवृष्टी झाल्यानंतर लोकांना दूषित पाण्यातून चालावे लागले, तर शरीरावरील जखमांमधून या रोगाचे जंतू आपल्या शरीरात प्रवेश करु शकतात.

लक्षणे

या रोगाची ताप, तीव्र डोकेदुखी, थंडी वाजणे, स्नायुदुखी, उलटी, कावीळ, रक्तस्त्राव इत्यादी लक्षणे आहेत. रुग्णांना श्वासोच्छश्वास करण्यास त्रास होणे, मूत्रपिंड व यकृत निकामी होणे, अशी लक्षणेही आढळतात. त्यांना योग्यवेळी औषधोपचार न मिळाल्यास व्यक्तीचा मृत्यु होण्याचा धोका संभवतो.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी

पावसाळ्यात कोणताही ताप डेंग्यु, मलेरिया अथवा ‘लेप्टोस्पायरोसिस’असू शकतो. त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

पायावर जखम असल्यास साचलेल्या पाण्यातून ये-जा करणे टाळावे किंवा गमबुटाचा वापर करावा.

साचलेल्या पाण्यातून चालून आल्यावर पाय साबणाने स्वच्छ धुवून कोरडे करावे.

साचलेल्या पाण्यातून चालल्यामुळे ‘लेप्टोस्पायरोसिस’संसर्ग होण्याची शक्यता असते त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ‘लेप्टोस्पायरोसिस’ प्रतिबंधात्मक उपचार तातडीने घेणे आवश्यक आहे.

ताप आल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पुरेशी विश्रांती, पोषक आहार व वेळेत उपचार घ्यावा.

उंदीर- घुशींचा नायनाट करावा.

उंदीर नियंत्रणासाठी उंदराला अन्न मिळू न देणे, उंदराचे सापळे रचणे, त्याला विष घालणे इत्यादी मार्ग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार वापरात आणावे.

घरात व आजुबाजूला कचरा साठणार नाही, याची दक्षता घ्यावी व कच-याची विल्हेवाट लावावी.


हे ही वाचा – Sushant Sucide Case: रियाचं असहकार्य! ईडीच्या प्रश्नावर एकच उत्तर ‘माहित नाही’


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -