राज्यातील कोरोनाची दुसरी लाट अधिक वेगाने पसरत आहे. त्यामुळे कोरोना रोखायचा असेल तर लॉकडाऊन अटळ आहे पण जरी लॉकडाऊन करायचा असेल तर सर्वांना विश्वास घेऊन केला जाईल, असं अस्लम शेख यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की, ‘महाराष्ट्राचे सरकार अचानक लॉकडाऊन लागू करणार नाही. टास्क फॉर्ससोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यामुळे आम्ही लोकांची परिस्थिती बिकट होऊन नये आणि लोकांमध्ये भीती निर्माण होऊ नये, यासाठी वारंवार लोकांसमोर येत आहोत.’
अस्लम शेख म्हणाले, ‘कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर लोकांना १ ते २ दिवसांचा कालावधी देणे, खूप महत्त्वाचे आहे. कारण लोकांचे कोणतेही कार्यक्रम किंवा प्रवासाचे नियोजन असेल तर ते रद्द करता येईल. दरम्यान मुंबईत रुग्णसंख्या का वाढतेय यावर अभ्यास केला जाणार आहे.’ सध्या अनेक राज्यांमध्ये लसीचा तुटवडा जाणवत आहे, अशा परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भात विचारले असताना मुंबईतचे पालकमंत्री म्हणाले की, ‘लसीकरण उत्सव कसा साजरा करायचा? लसीचा पुरवठा नाही आहे. लसीकरणाची संख्या आली त्यानुसार कोविड सेंटर उघडण्यात आली. त्यामुळे लसीबाबतचे सर्व निर्णय केंद्राकडे आहेत. गुजरातमधील काही भागांमध्ये तरुणांना लस दिली जाते, त्याप्रमाणे महाराष्ट्रात ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. तिथल्या तरुणांना लस देण्यास परवानगी द्या?, अशी मागणी करण्यात आली. पण ते काही झालेलं नाही. मुंबईत सध्या २ लाख ३५ हजारपर्यंत लसीचा साठा उपलब्ध आहे. हा फक्त २ ते ३ दिवस पुरेल इतका लसीचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे अशा परिस्थिती लसीकरणाचा उत्सव कसा करायचा? म्हणून सरकारने जिथे जिथे रुग्ण वाढत आहेत, तिथे लसीकरणाचा जास्त पुरवठा करावा.’
हेही वाचा – Corona Vaccination: भारताने कोरोना लसीकरणात अमेरिका, चीनला टाकले मागे