राज्यातल्या युती सरकारने आज (मंगळवार) निवडणुकांपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी आणि ग्रामीण जनतेला चुचकारण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. निवडणुकांना डोळ्यांसमोर ठेऊनच या अर्थसंकल्पाची मांडणी केली गेल्याचीही टीका झाली. मात्र, त्याचवेळी मुंबईकरांसाठी अर्थसंकल्पात काय तरतूद करण्यात आली आहे, त्याविषयीची उत्सुकता मुंबईकरांना होती. त्यानुसार सायन पनवेल महामार्ग, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग या तीन प्रकल्पांची तरतूद या अंतरिम अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
सायन-पनवेल महामार्ग
सायन-पनवेल महामार्गामुळे या परिसरातल्या वाहतुकीचा मोठा प्रश्न सुटणार असून यातल्या ठाणे खाडी पूल क्रमांक ३साठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. या पुलाच्या बांधकामासाठी ७७५ कोटी ५८ लाख रुपयांच्या तरतुदीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचं काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – ..आणि सुधीर मुनगंटीवारांनी दिला विरोधकांना ‘शाप’!
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे
मुंबई आणि पुण्यातल्या नागरिकांसाठी महत्त्वाचा आणि अत्यंत सोयीचा असणारा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा अधिक सुलभ करण्यासंदर्भात देखील यंदाच्या अर्थसंकल्पात उल्लेख करण्यात आला आहे. या मार्गातील लांबचे अंतर कमी करण्यासाठी विविध ठिकाणि दुरुस्ती आणि बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण ६ हजार ६९५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं अर्थसंकल्पात नमूद करण्यात आलं आहे. या प्रकल्पाचं काम प्रगतिपथावर असल्याचं देखील अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
नागपूर-मुंबई सममद्धी महामार्ग
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, त्याचं काम आणि त्यासाठी होणारं जमीन अधिग्रहण हे मुद्दे बरेच चर्चेत राहिले आहेत. या संपूर्ण मार्गाचं काम एकूण १६ पॅकेजेसमध्ये करण्याचं नियोजन सरकारने केलं आहे. त्यापैकी १४ पॅकेजेसचं काम सुरू करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आल्याचं अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.