Maharashra SSC Exam : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पेपर फुटीचे प्रकरण गाजत आहे. अशातच आज राज्यभरात दहावीची परीक्षा सुरु झाली आहे. कोरोनानंतर जवळपास दोन वर्षांनंतर इयत्ता दहावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली जातेय. मात्र बोर्डाच्या पहिल्याच पेपरला उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून गैरप्रकार घडवून आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याचपार्श्वभूमीवर आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पेपर फुटीप्रकरणात मोठी घोषणा केली आहे. कोणत्याही शाळेत यापुढे पेपर फुटीचे प्रकरण घडल्यास त्या शाळेची मान्यता थेट काढून घेतली जाणार अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत केली आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नगर जिल्ह्यातील शाळेतून पेपर फुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर त्या शाळेची मान्यता काढून घेण्यात आल्याचे जाहीर केले. तसेच यापुढे ज्या शाळेतून पेपर फुटीचे प्रकरण समोर येईल त्या शाळांची मान्यता काढून घेण्यात येईल, याशिवाय कॉपीचे प्रकरण आढळणाऱ्या शाळांना त्यानंतर परीक्षा केंद्र दिले जाणार नाही. असेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.
यासोबत विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांवर 1 तास आधी पोहोचावे. सकाळी 10.30 चा पेपर असल्यास 9.30 वाजता तर दुपारी 3 वाजता पेपर असल्यास 2 वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचावे. तसेच उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्ण तपासणी करूनचं परीक्षा केंद्रावर सोडण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
परीक्षेसंदर्भात गैरसमजाचे वातावरण पसरू नये कारण दहावीचे विद्यार्थी हेच राष्ट्राचे आणि देशाचे भवितव्य आहेत. त्यामुळे त्यांना निर्भीडपणे परीक्षा देण्यासाठी वातावरण निर्माण करावे. शाळा तिथे परीक्षा केंद्र असल्याने राज्यात यावेळी दहावीच्या परीक्षेला मोठ्या प्रमाणात परीक्षा केंद्र वाढले आहे. पोलिसांच्या बंदोबस्त अधिक देण्याची विनंती केली आहे. जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी यासाठीची माहिती घेऊन परीक्षा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असेही वर्षा गायकवाड यांनी सभागृहात सांगितले.