घरमुंबईMaharashtra Lockdown 2021: उद्योजकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे - सुभाष देसाई

Maharashtra Lockdown 2021: उद्योजकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे – सुभाष देसाई

Subscribe

कामगारांच्या हिताचे रक्षण करावे व कामगार कपात टाळावी असेही सुभाष देसाई म्हणाले.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लॉकडाऊन लावण्यात आले आहे. या लॉकडाऊनला बुधवार रात्रीपासून सुरुवात झाली. मात्र, अत्यावश्यक सेवा, अन्नप्रक्रिया, पॅकेजिंग, निरंतर प्रक्रिया करणारे उद्योग या साऱ्यांना उत्पादन सुरु ठेवण्याची संमती आहे. परंतु, उद्योग विश्वाने राज्य शासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करावे आणि शासनाने जारी केलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे. वसई-विरार परिसरातील तीन औद्योगिक संघटनांचा वतीने आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.

वसईच्या पट्ट्यातील उद्योजक निर्यातीत आघाडीवर आहेत. शासनाने निर्यात प्रधान उद्योग सुरु ठेवण्याची मुभा दिली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा, अन्नप्रक्रिया, पॅकेजिंग, निरंतर प्रक्रिया करणारे उद्योग या साऱ्यांना उत्पादन सुरु ठेवता येणार आहे. उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा, असे देसाई म्हणाले. वसई-विरार परिसरातील उद्योग संघटनांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कोविड चाचण्या, रुग्णालय आदी सुविधा सज्ज ठेवल्याबद्दल देसाई यांनी संबंधितांचे कौतुक केले.

- Advertisement -

उद्योगांमध्ये २० ते ४० वयोगटातील कामगार वर्ग मोठ्या संख्येने काम करतो. लसीकरणासाठी ४५ वर्षे वयाची अट आहे. ती अट शिथिल करून या २० ते ४० वयोगटातील कामगारांचा लसीकरणासाठी समावेश करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले.

कोविडची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. पुढील पंधरा दिवसांत रुग्णवाढीचा वेग वाढण्यात शक्यता आहे. खाटांची संख्या कमी पडत आहे. ऑक्सिजनची गरज वाढली आहे. परिस्थिती अधिक गंभीर होऊ नये, यासाठी १५ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. उद्योग विश्वाने या लॉकडाऊनचे कठोरपणे पालन करण्याचे आवाहन देसाई यांनी केले.

- Advertisement -

कोरोना संकटामुळे राज्यशासन दुहेरी संकटात आहे. या संकट काळात उद्योगांना झळ बसणार आहे. त्यांनी ती सहन करण्याची तयारी दाखवावी. कामगारांच्या हिताचे रक्षण करावे व कामगार कपात टाळावी असेही सुभाष देसाई म्हणाले. या चर्चासत्रात वसई-विरार औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष अनिल आंबर्डेकर, गोवालिस संघटनेचे सी. ए. अँटो, वसई तालुका औद्योगिक संघटनेचे अभय जिन्सिवाले, आशिष आपटे आदी सहभागी झाले होते. यावेळी उद्योग विभागाचे सहसचिव संजय देगावकर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -