राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठ्याप्रमाणात घट होताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर राज्य सरकार आता इतर अनावश्यक वस्तूंच्या दुकानांना सुरु ठेवण्याच्या वेळेत सवलत देण्याची शक्यता आहे. यासंदर्भात निर्णय लवकर घेतला गेल्यास व्यावसायिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
तसेच राज्य सरकारने १ जूनपासून राज्यातील सर्व सेवा आणि उद्योग क्षेत्र सुरु करण्यासाठी योजना आखत असून या योजनेवर सध्या काम सुरु आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वच जिल्ह्यांना या योजनेतून दिलासा मिळणार नाही. ज्या जिल्ह्यांमध्ये वाढणारी रुग्णसंख्या, आरोग्याविषयक पायाभूत सुविधा आणि भार, रुग्णसंख्येचा पॉझिटिव्ह रेट यांसारख्या बाबींचा विचार करूनच सर्व निर्णय घेतला जाणार असले स्पष्ट केले आहे.
राज्यातील २० हून अधिक जिल्ह्यांतील कोरोना रुग्णसंख्येचा पॉझिटिव्ह रेट हा १० टक्क्याहून अधिक आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये अनावश्यक दुकाने सुरु करण्यासंदर्भातील निर्णय देण्यासाठी परवानगी नाही. त्यामुळे अशा जिल्ह्यांना सध्या दिलासा मिळणार नाही. परंतु आठवड्याभरात टास्क फोर्सच्या सदस्यांशी बैठक घेत निर्णय घेण्यात येईल. अशीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली. राज्य सरकार सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेत असून अद्याप कोणताही बदल केला नाही. परंतु अनावश्यक दुकांनाच्या वेळेत वाढ करुन देण्यासंदर्भात लवकरचं निर्णय घेतला जाऊ शकतो. सध्या अत्यावश्यक म्हणून वर्गीकृत वस्तूंची करणारी सर्व दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु ठेवण्याची परवानगी आहे.
दरम्यान सरकारी कार्यालयांमध्येही आता कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढविण्याची शक्यता आहे. सध्या सार्वजनिक क्षेत्रातील कार्यालयांमध्ये केवळ १५ टक्केच कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्य सरकार काही निर्बंध शिथिल करण्याचा विचार करीत आहे, परंतु प्रवाशांना लोकल गाड्यांमध्ये आणि जिल्हाअंतर्गत प्रवासासंदर्भातील बंधने काही काळ कायम राहतील.
Covaxin EUL मिळवण्याचा प्रयत्नात, भारत बायोटेकने ९० टक्के कागदपत्रे WHO ला सोपविली