देशभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असताना सर्वच स्तरावर खबरदारी घेतली जात आहे. संसर्ग वाढू नये यासाठी देश तब्बल २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी तोंडावर मास्क किंवा रुमाल बांधून बाहेर पडत आहेत. त्यामुळे सध्या बाजारात मास्कचा तुटवडा जाणवत आहे. अशातच पश्चिम रेल्वेच्या दर्जी खात्यामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी नागरिकांसाठी माक्स आणि हॉस्पिटलच्या रुग्णासाठी खाटा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या चार दिवसांपासून युद्ध स्तरावर माक्स बनवण्याचे काम सुरू आहे.
हेही वाचा : Coronavirus Lockdown: घरच्यांच्या विरोधानंतरही घराबाहेर पडला आणि जीवाला मुकला
भारतासह संपूर्ण जगात करोना विषाणूने झपाट्याने पसरत आहे. या करोना बाधित रुग्णांची संख्या राज्यात दिवसेंदिवस वाढतच आहे. करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव थांबवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस म्हणजे १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. बाहेर न पडण्याचे आणि नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहनसुद्धा करण्यात आले आहे. करोना विषाणू हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे नागरिकांना social distancing ठेवण्यास सांगितले आहे. घराबाहेर जात असताना नाका तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. करोना विषाणू हा बाधित व्यक्तींच्या खोकल्यातून पसरतो. खोकल्यातील तुषार आपल्या श्वासाबरोबर शरिरात गेले की या आजाराची लागण होते. त्यामुळे खबरदारी म्हणून आज नागरिक नाकाला आणि तोंडाला मास्क लावताना दिसून येत आहेत. बाजारपेठेतही या मास्कची मागणी गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. मात्र मास्कचा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात तुटवडा दिसून येत आहे. सामान्य नागरिकांसाठी आणि रेल्वे हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेतील लोअर परेल कारशेडच्या दर्जी विभागाने मास्क आणि हॉस्पिटलसाठी खाटा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यत शेकडो मास्क तयार करण्यात आले आहेत.
‘त्या’ रेल्वे कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक
करोना विषाणूसारख्या साथीच्या आजारामुळे भारतीय रेल्वेने १४ एप्रिल २०२० पर्यंत देशभरातील प्रवासी रेल्वे सेवांचे कामकाज स्थगित केले आहे. सध्या भारतीय रेल्वेकडून जीवनावश्यक वस्तूच्या मालवाहतूक करणाऱ्या गाड्या चालवल्या जात आहेत. तसेच पश्चिम रेल्वे लोअर परेल कारशेडमधील दर्जी विभाग आता रेल्वेचे सीट बनवण्याचे सोडून आपत्कालीन परिस्थितीत मास्क आणि हॉस्पिटलसाठी खाटा तयार करत आहेत. एकूण २० अनुभवी कर्मचारी गेल्या चार ते पाच दिवसांपासून सतत काम करत आहेत. आतापर्यंत शेकडो मास्क तयार केले असून त्यांच्या समाज उपयोगी कामाचे संपूर्ण रेल्वे विभागात कौतुक होत आहे.