मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एसआरए प्रकल्पातील सहा सदनिका बळकावल्या गंभीर आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यासंबंधीत याचिका देखील मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांत उत्तर द्या असे निर्देश दिले आहेत. दरम्यान, सोमय्या यांनी याचिकेत पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
वरळी येथील गोमाता जनता एसआरए प्रकल्पामध्ये लाभार्थी नसताना देखील किशोरी पेडणेकर यांनी सहा सदनिका बळकावल्या. त्यानंतर त्या सदनिकांच्या पत्त्यांवर कंपन्या देखील स्थापन केल्या, असं सोमय्या यांनी त्यांच्या याचिकेमध्ये नमुद केलं आहे. सोमय्या यांच्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेत किशोरी पेडणेकर, मुंबई महापालिका व एसआरए प्राधिकरणाला निर्देश दिले आहेत. या प्रकरणावर दोन आठवड्यांत उत्तर द्या असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या याचिकेत किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. किशोरी पेडणेकर यांनी बेकायदेशीर पद्धतीने सहा सदनिका बळकावल्या आणि या सदनिकांच्या पत्त्यावर कंपन्या स्थापन केल्या. त्यामुळे या संपूर्ण भ्रष्टाचाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, तसंच त्यांच्याविरोधात फौजदारी फौजदारी कारवाई सुरु करण्याचे आदेश देण्यात यावेत आणि किशओरी पेडणेकर यांना नगरसेविका म्हणून अपात्र घोषित करण्याची कार्यवाही सुरू करण्याचे आदेशही द्यावेत, अशी विनंती किरीट सोमय्या यांनी याचिकेद्वारे न्यायालयाला दिली.