देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आहे. यामुळे परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर झाली असून मुंबईसह विविध जिल्ह्यात, रुग्णालयं कोरोनारुग्णांनी भरली आहेत. यामुळे बेड व व्हेंटीलेटरची कमतरता उद्भवली आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनचा इशारा दिला होता. पण विविध क्षेत्रातील संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर आज राज्य सरकारने महाराष्ट्रात मिनि लॉकडाऊन जाहीर केला आहे. याअंतर्गत ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
देशात जानेवारीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून देशात सर्वाधिक कोरोनारुग्ण असलेल्या दहा जिल्यांपैकी ९ जिल्हे एकट्या महाराष्ट्रात आहेत. यामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार अशी चर्चा होती. यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारवर कडाडून टीका करत लॉकडाऊनला आमचा विरोध असल्याचे म्हटले होते. त्यावरून राजकारणही तापले होते. जनतेच्या मनातही संभ्रम होता. लॉकडाऊन झाल्यास गरीबांची उपासमार होईल, पुन्हा एकदा राज्याची आर्थिक घडी विस्कटेल असे बोलले जात होते. सामान्य जनतेचाही लॉकडाऊनला विरोध होता. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी जनतेशी संवाद साधत दोन दिवसात लॉक़डाऊन सदर्भात निर्णय घेणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील तज्ज्ञांबरोबर चर्चा करूनच आपण अंतिम निर्णय घेऊ असेही ते बोलले होते.
त्यानंतर शनिवारी प्रसारमाध्यमे, उद्योजक, मराठी नाट्य निर्माते, जीम मालक आणि राज्यातील मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृह चालक-मालक संघटनेच्या प्रतिनिधींशी ठाकरे यांनी चर्चा केली.
यावेळी‘जिंदगी, जान उसके बाद काम,’ याप्रमाणे पुढे जावे लागेल. त्यासाठी आता काही पावले उचलावी लागणार आहेत . लोकांच्या मनातून कोरोनाची भीती गेली तरी त्यामुळे बेफिकिरी वाढली असेही ते म्हणाले होते. यामुळे वेळ पडल्यास लॉकडाउन करावा लागेल असे संकेत त्यांनी दिले होते. त्याचबरोबर सर्वच पक्षांना सहकार्य करण्याची विनंती त्यांनी केली होती. त्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची दुपारी तीन वाजता बैठक घेण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्रात ३० ए्प्रिल पर्यंत कडक निर्बंद्द लावण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.