मुंबई महापालिकेच्या उपनगरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी पवई तलावा लगत उभारण्यात येणारा ‘सायकल आणि जॉगिंग ट्रॅक’ प्रकल्प आहे. मात्र या प्रकल्पाला शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवत स्थगिती दिली आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून पवई तलावाच्या भोवती हा सायकल ट्रॅक उभारण्यात येणार होता. मात्र या सायकल ट्रॅकला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुंबई पालिकेला मोठा धक्का बसला आहे.
मात्र उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता सामंत यांनी ट्विट करत आभार व्यक्त केले आहेत.
पवई लेक मधील सायकल ट्रॅक ला स्थगिती दिल्याबद्दल ऊच्च न्यायालयाचे आभार.
चुकीची गोष्ट कुणीही केली ती चुकीचीच असते.
सगळ्या पर्यावरण प्रेमींचं अभिनंदन.— Ruta Samant (@RutaSamant) May 7, 2022
ऋता आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले की, पवई लेकमधील सायकल ट्रॅकला स्थगिती दिल्याबद्दल उच्च न्यायालयाचे आभार… चुकीची गोष्ट कुणीही केली तरी ती चुकीचीच असते, सगळ्या पर्यावरण प्रेमींचे अभिनंदन.. मात्र ऋता सामंत यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. सरकारमधील मंत्र्यांचीच पत्नी सरकारवर टीका करत असल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान मुंबई महानगरपालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून पवई व विहार तलावा लगत सायकल ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक उभारण्याची योजना आखली होती. मात्र महापालिकेतील विरोधी पक्षांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध करण्यात आला.
दरम्यान या प्रकल्पावरून मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झटका दिला आहे. उच्च न्यायालयाने म्हटले की, हा प्रकल्प कथितपणे पाणखळ जागा (संरक्षण आणि व्यवस्थापन) नियमांचे उल्लंघन करणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प बेकायदेशीर आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत बीएमसीला कोणतीही सुधारणा किंवा बांधकाम करण्यास मनाई आहे. मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आता मुंबई पालिका सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते. असे म्हटले आहे.
दरम्यान याआधी भाजप खासदार मनोज कोटक यांनीही केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी पत्र लिहून हा सायकल ट्रॅकचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे म्हटल होते.