तब्बल दोन महिन्यांनंतर मुंबईत मिशन बिगीन अगेन अंतर्गत पुन्हा बेस्ट बसेस सुरू करण्यात आल्या. मिशन बिगीन अगेनच्या तिसऱ्या टप्प्यात खासगी कार्यालयांना १० टक्के कर्मचाऱ्यांसह काम करण्याची परवानगी देखील देण्यात आली. त्यामुळे प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता बेस्टकडून बसेसचं नियोजन देखील करण्यात आलं. मात्र, या सगळ्या नियोजनावर पहिल्याच दिवशी पाणी फेरलं गेल्याचं चित्र मुंबई आणि उपनगरांच्या वेगवेगळ्या भागांमध्ये दिसून आलं आहे. या भागांमध्ये अगदी भल्या पहाटेपासूनच प्रवाशांनी बससाठी रांगा लावल्याचं दिसून येत होतं. मात्र, बेस्ट बसचा पत्ता नव्हता! त्यामुळे मुंबईकरांमध्ये नाराजीचं आणि संतापाचं वातावरण दिसून येत होतं. त्यासोबत, बेस्टचं अपुरं नियोजन पुन्हा एकदा उघड झालं.
विरार-नालासोपाऱ्यातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मुंबईकरांना सकाळीच कार्यालयात जाण्यासाठी बेस्ट बसची आशा होती. मात्र, त्यांची ही आशा फोल ठरली. दिवसभरात बेस्टने या मार्गावर २० बसेस सोडल्यामुळे सकाळपासूनच मुंबईकरांनी रांगा लावल्या होत्या. मात्र, ज्या बसेस येत होत्या, त्या अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठीच असल्याचं त्यांना सांगितलं जात होतं. त्यामुळे नक्की बस येणार कधी आणि आम्ही कामावर पोहोचणार कधी? असाच प्रश्न इथल्या प्रत्येक मुंबईकराच्या मनात होता. अखेर अनेक मुंबईकरांनी बस न मिळाल्यामुळे पुन्हा घरचा रस्ता धरला!
मुलुंड चेकनाक्यावर देखील वाहनांच्या रांगा!
दरम्यान, ठाण्याहून मुंबईत प्रवेश करण्यासाठी असलेल्या मुलुंड चेकनाक्यावर देखील आज सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. खासगी कार्यालये सुरू करण्याची परवानगी दिल्यामुळे मोठ्या संख्येने कर्मचारी वर्ग घराबाहेर पडला. त्यामुळे चेकनाक्यावर गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. मुंबईच्या अनेक भागांमध्ये बेस्ट बसेस उपलब्ध नसल्यामुळे मुंबईकरांनी खासगी गाड्या रस्त्यावर आणल्या. त्यामुळे ट्रॅफिक जामचा देखील अनेकांना सामना करावा लागत आहे.