आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा मसुदा जाहीर झाला. यात ४० लाख बांग्लादेशी नागरिक हे बेकायदेशीर वास्तव्य करत असल्याचे दाखवण्यात आला. म्हणजेच आसाम राज्यात ४० लाख नागरिक घुसखोर असल्याची माहिती समोर आली. घुसखोर फक्त आसाममध्येच नसून ते मुंबईतही आहेत. त्यामुळे मुंबईतील बांग्लादेशीय घुसखोरांवरही हीच कारवाई झाली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना(एमएनएस) व्दारे करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ह्याचं मुद्द्यावर गेली अनेक वर्ष बोलत आहेत. मुंबईसारख्या शहरांवर जिथे देशभरातून लोंढे आदळत आहेतच पण बांग्लादेशी घुसखोरांनी देखील इथे बस्तान बसवलं आहे.आपल्या बेकायदेशीर वस्त्या उभ्या केल्या आहेत. त्यामुळे मुंबई शहराच्या सुविधावर ताण तर पडत आहे. पण इथल्या कायदा सुव्यवस्थेला पण मोठा धोका निर्माण झाला असल्याचे मनसे नेत्यांनी म्हटलं आहे.
आसाममध्ये जसा राष्ट्रीय नागरिक नोंदणीची मोहीम हाती घेतली आहे तशी तातडीने मुंबईत पण घ्यायला हवी. ह्यासाठी सरकारने विशेष कृतीदल स्थापन करावं आणि त्यांना ह्या बांग्लादेशीयांना बाहेर काढण्याचे सर्वाधिकार द्यावेत आणि तसंच ते पुन्हा परतणार नाहीत ह्याची देखील दक्षता घ्यायला हवी अशी मागणी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.
काय आहे एनसीआर?
देशातील पूर्व-उत्तर राज्य ‘आसाम’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली राष्ट्रीय नागरी नोंदणी (एनसीआर) यादीतून ४० लाख रहिवाशांना वगळण्यात आले आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांदरम्यान फाळणी झाल्यानंतर आसाम राज्यात वसलेल्या लोकांना यादीत स्थान न देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे हे ४० लाख नागरिक आता दोन्ही देशाचे नागरिकत्वांना मुकणार असल्याने या नागरिकांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यादीत आसाम राज्यातील लोकसंख्या २.८९ कोटी दाखवण्यात आली आहे. २४ मार्च १९७१ रोजी बांग्लादेश पाकिस्तान पासून विभाजीत झाला होता. या विभाजनादरम्यान काही बांग्लादेशीयांनी आसाम राज्यात आश्रय घेतला. बांग्लादेशी घुसखोरांना थांबवण्यासाठी ही कारवाई केली जात आहे.