शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज ठाकरे यांची मनसे आता मैदानात उतरणार आहे. येत्या १७ मे रोजी ठाण्यात विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातून किमान ५ हजार शेतकरी या मोर्चात उपस्थित राहणार असल्याचे मनसेचे पालघर आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी म्हंटले आहे. ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विविध जिल्ह्यातील शेतकरी एकत्र
राज्यात दुष्काळी परिस्थिती सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वचं पक्षांनी दुष्काळी दौरे सुरु केले आहेत. याचदरम्यान राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरणार आहे. आंबा स्टॉल लावल्याने भाजपा नगरसेवकाकडून सचिन मोरे या शेतकऱ्याला २० हजार रुपयांची मागणी केली. हे पैसे शेतकऱ्याने देण्यास नकार दिल्याने पालिकेकडून या शेतकऱ्याच्या स्टॉलवर कारवाई करण्यात आली. आंबा स्टॉलसाठी परवानगी मागितली असताना ती नाकारण्याचं कोणतंही ठोस कारण महापालिकेकडे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी येत्या १७ मे रोजी ठाण्यात शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार असल्याचे मनसेचे पालघर आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी म्हटले आहे. नाशिकहून राहुल ढिकले, पुण्याहून बाबाराजे जाधवराव, मराठवाड्यातून जावेद शेख, कोकणातून वैभव खेडेकर या मनसे नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या शेतकरी मोर्चासाठी शेतकरी ठाण्यात दाखल होतील. तसेच ठाणे जिल्ह्यातील शेतकरी, आदिवासी, ग्रामपंचायत सदस्य मोर्चात सहभागी होतील. या मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटनांनीही या मोर्चाला पाठिंबा दिला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.