घरमुंबईसीमासंघर्ष थांबवण्यासाठी केंद्राने लक्ष घालावं; राज ठाकरेंचा बोम्मईंनाही इशारा

सीमासंघर्ष थांबवण्यासाठी केंद्राने लक्ष घालावं; राज ठाकरेंचा बोम्मईंनाही इशारा

Subscribe

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आता चांगलाच चिघळत आहे. काल बेळगावच्या हिरेबागवाडी या ठिकाणी कन्नड रक्षक वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील गाड्यांची तोडफोड करत रास्ता रोको केला. याचबरोबर महाराष्ट्र सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. या घटनेमुळे आता महाराष्ट्रातही संतापाची लाट उसळली आहे. कर्नाटकच्या सरकारच्या भूमिकेवरही महाराष्ट्रातून तीव्र विरोध केला जात आहे. यात महाराष्ट्रातून विरोधी पक्षांनी आता केंद्र सरकारने या घटनेत लक्ष घालण्याची मागणी केली आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील कर्नाटक महाराष्ट्र संघर्ष थांबवण्यासाठी केंद्राने लक्ष घालावं असे आवाहन केले आहे. तसेच कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनाही तोंडवर आवर घाला आणि महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, तिथल्या मराठी माणसांना त्रास असले प्रकार सुरु आहेत ते तात्काळ थांबवा, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.      राज ठाकरेंनी याबाबत एक पत्र ट्विटरवर शेअर केलं आहे.

- Advertisement -

राज ठाकरेंनी हे पत्र शेअर करत लिहिले की, कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कलह हवाय आणि त्यासाठी महाराष्ट्राला जाणूनबुजून लक्ष्य केलं जातंय. महाराष्ट्राने जे काही मिळवलं आहे ते संघर्ष करून मिळवलं आहे त्यामुळे संघर्षाला आम्ही तयार असतो. पण तो होऊ नये असं वाटत असेल तर आता केंद्राने लक्ष घालावं, असा धमकी वजा इशाराच केंद्र सरकारला दिला आहे.

राज ठाकरेंनी पत्रात नेमकं काय म्हटलं?

मी मध्यंतरी बोललो तसं, महाराष्ट्र- कर्नाटकाचा सीमावाद उफाळून यावा, ह्यासाठी पुन्हा कोणाकडून तरी प्रयत्न सुरु झाले आहेत. तिकडून कोण खतपाणी घालतयं हे तर उघड दिसतंय, पण इथे कोण ह्याला खतपाणी घालत आहे का? हे सरकारने पहायला हवं. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा आणि हा प्रश्न चिघळू देऊ नये. महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, तिथल्या मराठी माणसांना त्रास असले प्रकार सुरु आहेत ते तात्काळ थांबवा.

- Advertisement -

हा प्रश्न चर्चेने आणि सामोपचारानेच सुटायला हवा, पण जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल तर, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करू शकते ह्याची चुणूक माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दाखवली आहे. त्यामुळे गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका. येणाऱ्या २०२३ च्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांसाठी हा मुद्दा उकरून काढला जातोय आणि महाराष्ट्राला नाहक छळलं जातंय. माझं मराठी बांधवांनाही हे सांगणं असेल कि त्यांना जे हवंय ते नाही द्यायचं आपल्याला जे हवंय तेच आपण करायचं.

अचानकपणे चहुबाजुंनी राज्याच्या सीमांवर दावा सांगितला जातोय, हे प्रकरण साधंसोपं नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटं पिरगळली जातील हे बघावं. इथे आपण कुठल्या पक्षाचे आहोत हे विसरून, महाराष्ट्राचे आहोत हे स्मरून कृती व्हावी अशी अपेक्षा. केंद्र सरकारनेही ह्या प्रश्नात वेळीच लक्ष घालावे आणि हा वाद चिघळणार नाही हे पहावं.

मी पुन्हा सांगतो कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्यांच्यात कमालीचा एकजिनसीपणा आहे, आज इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. त्यामुळे संघर्ष होऊच नये. पण तरीही जर समोरून कर्नाटकाची भाषा निव्वळ आव्हानाची असेल तर ते स्वीकारायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इथली मराठी जनता तयार आहे. संघर्ष न होण्यात आणि मैत्र टिकण्यातच सर्वांचं हित आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -