नागरिकत्व कायद्याविरोधात मुंबईत गुरुवारी ऑगस्ट क्रांती या मैदानात शांततेत आंदोलन करण्यात आलं. वीस हजारांहून अधिक लोक या आंदोलनासाठी दाखल होते. आंदोलनात महिलांची संख्या ही लक्षणीय होती. संध्याकाळी ४ वाजता हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं. पण, लोकांनी दुपारपासूनच मैदानावर यायला सुरूवात केली. या आंदोलनासाठी फक्त मुस्लिम समाजच नाही तर विद्यार्थी संघटना, छात्र भारती संघटना आणि विशेष म्हणजे बॉलिवूड सेलिब्रिटींची उपस्थिती होती.
हेही वाचा – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ मुंबई, पुण्यात आंदोलनं
शांततामय वातावरणात आंदोलन पार पडलं
मागील काही दिवसांपासून नवी दिल्लीतील अनेक भागांमध्ये या कायद्याविरोधात हिंसाचार सुरू आहे. पण, मुंबईकरांनी आपल्या संविधानाची शिस्त पाळत अगदी शांतमय वातावरणात हे आंदोलन पार पडलं. आंदोलनाला हिंसक वळण लागू नये याची खबरदारी पोलिसांनी घेत मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात पसरलेली धग आता महाराष्ट्रातही पोहोचली आहे. महाराष्ट्राच्या मालेगाव, नागपूर, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद आणि औरंगाबाद या ठिकाणीसुद्धा आंदोलनं करण्यात आली. त्यानंतर मुंबईत सुद्धा गुरुवारी सर्व संघटनांनी एकत्र येत ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलन छेडलं. पण, या सर्वात पुन्हा एकदा महाराष्ट्रासह मुंबईने संयमाचं दर्शन घडवून आणलं. या आंदोलनाला मुंबईकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत आपलं म्हणणं मांडलं.