नोव्हेंबर महिन्यात दिवाळीपासूनच गायब झालेली थंडी डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात चांगलीच जाणवू लागली आहे. राज्यात तापमान ८.८ डिग्री सेल्सिअस खाली घसरले आहे. तर आर्थिक राजधानी मुंबईत मात्र तापमानाचा पारा महाबळेश्वरपेक्षाही खाली घसरला आहे. मुंबईकरांनी आज सकाळीच थंडीचा गारवा अनुभवला. शुक्रवारी रात्रीपासूनच थंडीचा प्रभाव मुंबई उपनगरात जाणवायला लागला होता. परिणामी आज मुंबईत तापमानाचा पारा हा महाबळेश्वरपेक्षाही खाली घसरल्याची आकडेवारी आहे. महाबळेश्वरमध्ये किमान १९ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, पण त्याहून कमी तापमानाची नोंद ही सांताक्रुझ येथे म्हणजे १८.४ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबईकरांनी आज सकाळीही वातावरणातला हा गारवा अनुभवला. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने याआधीच नोव्हेंबरमध्ये जाहीर केल्याप्रमाणे खऱ्या थंडीची सुरूवात ही डिसेंबरमध्ये होईल असे म्हटले होते. त्यानुसारच आता थंडीचा अनुभव मुंबईकरांना येऊ लागला आहे.
राज्यात हिवाळ्याची चाहुल, किमान तापमानात घसरण
NASIK 11.1℃
PARBHANI 10.6°C
PARBHANI AGRI UNIV 8.8°C
PUNE 11.5°C
SANTACRUZ 18.4°C (This season’s lowest so far)
JALGAON 12.6°C
BARAMATI 11.9 °C
AURANGABAD 13.0°C
GONDIA 10.5°C
NAGPUR 12.4°C
अन्य बऱ्याच ठिकाणी तापमान अंशाच्या खाली.— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 5, 2020
राज्यात अनेक भागात थंडीचा पारा खाली घसरला आहे. थंडीचा पारा सर्वाधिक खाली घसरला आहे तो परभणीत ८.८ डिग्री सेल्सिअस. त्यापाठोपाठ गोंदियात १०.५ डिग्री सेल्सिअस, नाशिकमध्ये ११.१ डिग्री सेल्सिअस, पुणे ११.५ डिग्री सेल्सिअस, जळगाव १२.६ डिग्री सेल्सिअस, बारामती ११.९ डिग्री सेल्सिअस, औरंगाबाद १३ डिग्री सेल्सिअस, नागपूर १२.४ डिग्री सेल्सिअस अशी तापमानाची नोंद झाली आहे. सांताक्रुझमध्ये यंदाच्या थंडीच्या मौसमातील सर्वात कमी म्हणजे १८.४ डिग्री सेल्सिअसची नोंद झाली आहे. राज्यात हिवाळ्याची चाहूल असून अनेक भागात किमान तापमानाची घसरण झाल्याचे मत कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केले आहे. मराठवाडा आणि विदर्भात अनेक भागात तापमानाचा पारा हा १२ डिग्री सेल्सिअस ते १४ डिग्री सेल्सिअस इतका खाली येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर नाशिक, पुण्यासह मुंबईतही तापमानाचा पारा खाली घसरेल असे मत त्यांनी मांडले.
नोव्हेंबर महिन्यातच थंडीचा प्रभाव राज्यातील अनेक भागात जाणवू लागला होता. पण त्यावेळी मुंबईसह अनेक भागात जाणवणारा गारवा हा थंडीचा परिणाम नसून, खरी थंडी ही डिसेंबरमध्ये सुरू होईल असे मत हवामान विभागाने जाहीर केले होते. त्यानुसारच आता मुंबईत जाणवणारी थंडी ही यंदाच्या मौसमातली सर्वात कमी तापमान असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. थंडीचा प्रभाव मुंबईत वाढतानाच कोरोनाची दुसरी लाट ही विषाणूच्या प्रादुर्भावाला पोषक ठरेल असे याआधीच आरोग्य विभागाने सांगितले होते. त्यामुळेच आता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी थंडीच्या वातावरणात कोरोनासाठीच्या सुरक्षात्मक अशा उपाययोजना करणे अधिक गरजेचे आहे.