मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आता मोठ-मोठे निर्णय घेण्यास सुरुवात झाली आहे. आज वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबईतील पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत सलग आज दुसऱ्या दिवशी ८ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत ८ हजार ८२ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून २ जणांच्या मृत्यू नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८ लाख ७ हजार ६०२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १६ हजार ३७९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत ३७ हजार २७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
#CoronavirusUpdates
3rd January, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/jbtfkLFb5I— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 3, 2022
दरम्यान मुंबईत गेल्या २४ तासांत ६२२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ७ लाख ५१ हजार ३५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज मुंबईत आढळलेल्या ८ हजार ८२ रुग्णांपैकी ७ हजार २७३ रुग्ण एसिम्पटोमॅटिक म्हणजे लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. एकूण ५७४ रुग्णांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. मुंबईत आज दिवसभरात ४९ हजार २८३ कोरोना चाचण्या झाल्या असून आतापर्यंत १ कोटी ३८ लाख १४ हजार ९३३ चाचण्या झाल्या आहेत.
आज मुंबईत मृत्यू झालेल्या २ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील १ रुग्ण पुरुष आणि १ रुग्ण महिला होती. दोन्ही रुग्णांचे वय ६० वर्षावर होते. सध्या मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९३ टक्क्यांवर आला असून मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर १३८ दिवस झाला आहे. तसेच सक्रिय सीलबंद इमारतीची संख्या वाढत असून आता ३१८ झाली आहे. मुंबईत अशाप्रकारे रुग्णसंख्या वाढत राहिली तर येत्या काळात आणखीन कडक निर्बंध लागण्याची दाट शक्यता आहे.